पाथर्डी :दि.२फेब्रुवारी
गेली सहा वर्षांपासून नूतनीकरणाच्या कामासाठी पाथर्डी तालुक्यातून जाणारा कल्याण-निर्मल( विशाखापट्टणम) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ हा प्रलंबित आहे.राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्यामुळे ५० किलोमीटरच्या अंतरात रस्त्यावर अनेक वाहन अपघात झाले. यामध्ये अनेक प्रवाशांचा जीव गेला आहे. रस्ता व्हावा यासाठी प्रधानमंत्री सह रस्ते विकास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्रव्यवहार केले मात्र अनेक महिने उलटूनही कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद येथे रखडलेल्या महामार्गाचे काम तत्काळ पूर्ण व्हावे, यासाठी जनहित याचिका दाखल केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते मुकुंद भास्कर गर्जे यांनी माहिती अधिकारा अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग कामा संदर्भात माहिती जमवून रखडलेले काम तात्काळ व्हावे यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने केली होती, प्रशासनाने निवेदनाची वेळीच दखल न घेतल्यामुळे मुकुंद गर्जे यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली नितीन गडकरी यांच्याकडे देखील या संदर्भात तक्रारी दाखल केल्या होत्या. पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रीय महामार्ग कार्यालय अहमदनगर तसेच मुंबई यांना सदर रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम तात्काळ मार्गी लावण्यास संदर्भात पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता परंतु सदरील पत्र व्यवहाराला अनेक महिने उलटूनही कोणतीही कारवाई झाली नाही.
त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथे सदरील रखडलेल्या महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण व्हावे यासाठी जनहित याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस.व्ही.गंगापूरवाला तसेच एस. जी. दिघे यांनी २७ जानेवारी रोजी याचिकेवरील म्हणणे सादर करण्यासंदर्भात नोटीस काढली आहे.
महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव,राष्ट्रीय महामार्ग विभाग नवी दिल्ली, मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग कोकण भवन मुंबई, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग नाशिक, अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग पुणे, उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग पाथर्डी, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पाथर्डी, उपविभागीय अधिकारी पाथर्डी, जिल्हाधिकारी अहमदनगर, मुख्याधिकारी नगरपरिषद पाथर्डी, तहसीलदार पाथर्डी तसेच ठेकेदार इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन पुणे यांना याचिकेवरील म्हणणे सादर करण्यासंदर्भात नोटीस काढली असून म्हणणे सादर करण्यासाठी २४ मार्च पर्यंत वेळ देण्यात आला आहे. गर्जे यांच्यातर्फे अँड.अनिरुद्ध निंबाळकर हे काम पहात असून त्यांना अँड. रतन आढे व अँड.हरिहर गर्जे हे सहाय्य करत आहेत.