अहमदनगर दि. ३० डिसेंबर
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला सहा डिसेंबर रोजी आग लागली होती त्यानंतर या आगी मध्ये चौदा रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्य मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्र्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल असा इशारा देत या आगीच्या चौकशी प्रकरणी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची चौकशी समिती नेमली होती.
या चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करू असा आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अहमदनगर मध्ये दिले होते. या चौकशी समितीला सात दिवसांचा अवधी देण्यात आला होता मात्र आज या घटनेला ५४ दिवस उलटल्यानंतर राधाकृष्ण गमे यांनी अहमदनगर येथे नुतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटनाप्रसंगी आल्यानंतर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले की आग प्रकरणाचा अहवाल मुदतीच्या आत शासनाला पाठवला आहे. शासन स्तरावर याबाबत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले. पुढील कारवाई बाबत मला काही माहीत नसल्याचं सांगित गमे यांनी हात झटकले. त्यामुळे या अहवालाबाबत आता संदिग्धता निर्माण झाली आहे.
अहवाल शासनाला पाठवला असेल तर याबाबत ५४ दिवस उलटूनही प्रसिद्धीमाध्यमांना का सांगण्यात आले नाही? या अहवालाबाबत एवढी गोपनीयता का पाळली जातेय?अद्यापही शासनाने दोषींवर कारवाई का केली नाही? अहमदनगरच्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना ही अहवाल देण्यात आला नाही का?असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. का या प्रकरणातील दोषींना वाचवण्यासाठी शासनाकडून मुद्दामून दिरंगाई केली जात आहे का अशा अनेक प्रश्नांना मुळे ही आग आणि चौकशी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या आगीमध्ये मृत पावलेल्या निष्पाप रुग्णांना न्याय कधी भेटणार.