राज्यात सध्या कोणता ऋतू चालू आहे हे समजत नसून हिवाळा पावसाळा या दोन ऋतूंचे आगमन एकत्र झाले काय असेही चेष्टेने बोलले जातेय.गेल्या ४८ तासात मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाळी वातावरण झालेलं आहे. याचं कारण म्हणजे दक्षिण पूर्व अरबी समुद्रामध्ये एक सायक्लॉन सर्कुलेशन तयार झाले आहे. त्याचबरोबर एक द्रोणीय भाग कच्छपर्यंत सरकलेला आहे. याचा प्रभाव उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जास्त असेल. धुळे, नंदुरबार, अहमदनगर,नाशिक, पालघरमध्ये आज २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. तर कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरीत जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. डिसेंबर महिना म्हणजे थंडीचा महिना असतो त्यामुळे अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे थंडी आणि काही ठिकाणी गारा पडल्यामुळे वातावरण सध्या थंड झाले आहे याचा फटका अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मेंढी पालकांना बसला असून रांधे येथे ६० आणि वडगाव दर्या येथे १६ मेंढ्या थंडीमुळे मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त हाती येत आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेली पीक वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे द्राक्षे, आंबे ,ज्वारी ,हरभरा ही पिके आता हातातुन गेल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे.