अहमदनगर दि.१ फेब्रुवारी
नुकत्याच प्रभाग ९ मध्ये रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली. ही पोटनिवडणूक अनेक अर्थाने गाजली. अनेक राजकीय नाट्य यामध्ये पाहायला मिळाले. या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते घेत निकालावर परिणाम करणाऱ्या मनसे उमेदवार पोपट पाथरे यांना मोठ्या संख्येने मते मिळवून देणाऱ्या फिल्ड वरील कार्यकर्त्यांनी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.
प्रशांत जाधव, बिभीषण चव्हाण यांच्यासह डॉ. राहुल पवार, दत्तात्रय माणिकजडे, गौरव घोरपडे, बाळकृष्ण कोंडके, दीपक नवघरे, अनिल शिरसागर, जेष्ठ महीला कार्यकर्त्या झुंबरबाई जाधव, गौरव घोरपडे, अविनाश पाटील, सागर पोळ, सखाराम कोथंबिरे, ॲड. पी.व्ही. तांदळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी काँग्रेसचे प्रभारी डॉ. जगदीशदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये किरण काळे यांनी जाधव, चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिला.
यावेळी ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, मनपा माजी विरोधी पक्ष नेता दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक समाजाचे नेते शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चूडीवाला, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, राणीताई पंडित, जुबेर सय्यद, इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ शेख, शहर जिल्हा महासचिव इम्रान बागवान, कृषीरत्न दिनेश पाटील, राजेंद्र जाधव, निलेश भालेराव, निखिल चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. दशरथ शिंदे, अनंतराव गारदे यांच्या पुढाकारातून हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
प्रशांत जाधव, बिभीषण चव्हाण यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केल्यानंतर काळे यांनी उपस्थित प्रभाग ९ मधील कार्यकर्त्यांना आवाहन केले की, तुम्ही कामाला लागा. मनपा सार्वत्रिक निवडणुक अवघ्या दोन वर्षावर आली आहे. प्रभाग ९ मध्ये चारही नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून आणायचे आहेत. आगामी काळात काँग्रेस पक्षाशी आणि मंत्री बाळासाहेब बाळासाहेब थोरात यांच्याशी शतप्रतिशत प्रामाणिक असणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवाऱ्या दिल्या जातील.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनेक वर्ष ज्यांना जीव लावला, ज्यांना राजकीय बळ देत ज्यांच राजकीय करियर घडवलं. तेच थोरात यांच्यावर उलटले. याचा हिशोब जनता योग्य वेळी करेल. चार घरच्या पाहुण्यांना काँगेसच्या दारात उभे केले जाणार नाही. प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल असे काळे यांनी जाहीर केलं.
यावेळी प्रशांत जाधव म्हणाले की, आम्ही प्रत्येक निवडणुकीत पोपटराव पाथरे यांच्या मागं ताकद उभी केली. प्रत्येक वेळी आम्हाला यशाने हुलकावणी दिली. आता परत एकदा कात टाकून नव्या दमाने सुरुवात करण्याचा निर्णय आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र बसून घेतला आहे. किरण काळे यांच्यासारख्या दमदार आणि निर्भीड नेतृत्वाची नगर शहराला गरज आहे. नगर शहरासाठी विकासाचे व्हिजन काळे यांच्याकडे असल्यामुळेच आम्ही काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.
बिभीषण चव्हाण म्हणाले की, मी अनेक वर्ष चळवळीमध्ये काम केलं आहे. काँग्रेस हीच खरी समाजाची गरज आहे. आम्हाला काँग्रेसमध्ये येण्याची अनेक दिवसांपासून इच्छा होती. मात्र किरण काळे यांनी पक्षाची धुरा स्वीकारल्यापासून शहरामध्ये काँग्रेस बळकट झाली आहे. त्यामुळेच आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि किरणभाऊंच्या नेतृत्वात नगर शहरामध्ये चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली आणण्याचे काम आम्ही करणार असल्याचे या वेळी चव्हाण म्हणाले.