अहमदनगर दि २५ फेब्रुवारी
महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. या अटके विरोधात महाविकास आघाडी तर्फे अहमदनगर शहरातील मध्यवर्ती बसस्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप म्हणाले की आधीच्या काळामध्ये अनेक शहरांमध्ये रस्त्यावर पिंजरा त्यात पोपट ठेवून भविष्य सांगणारे अनेक लोक दिसायचे मात्र आता ते लोक दिसणे दुर्मिळ झाले आहे त्याच प्रकारे भाजपवाले सध्या अशाच पोपटाच्या आधारे भाजपचे सरकार येणार याच्या तारखांवर तारखा देत आहेत दोन वर्षापासून या तारखा देण्याचं काम भाजपच्या वतीने सुरू आहे मात्र अजूनही त्यांच्या पोपटाचे भविष्य खरे होताना दिसत नसल्यामुळे हे भविष्यवाले खोटे असल्याची टीका आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे भाजप केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून महाराष्ट्रातील सरकार डळमळीत करण्याचे काम करत असल्याचं आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे.
या आंदोलनाला सकाळी ११ वाजता सुरवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन चालले. या आंदोलनात राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, नीलेश लंके, आमदार सुधीर तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, कार्याध्यक्ष संदीप वर्प, घनश्याम शेलार, अभिजित खोसे, समीर खान ,काँग्रेसचे प्रदेश सहसचिव दीप चव्हाण, निखिल वारे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भगत, प्रकाश कुलट, संदीप गुंड आदी उपस्थित होते.
हे आंदोलन महाविकास आघाडीचे असताना मात्र शहर शिवसेनेने तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली होती.