अहमदनगर दि १२ जानेवारी
रस्त्यावर मोकाट फिरणारी गोवंशीय जनावरे पकडून त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई मनपा करते. पण जी जनावरे सोडवण्यासाठी त्यांचे मालक येत नाहीत, अशा जनावरांचा लिलाव मनपाद्वारे केला जातो.
महापालिका कोंडवडा विभागाने काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन १७ जानेवारीला महालिकेच्या कोंडवडा विभागाच्या ताब्यात असलेल्या गोवंशीय जनावरांचा लिलाव ठेवला होता मात्र या लिलावस येथील वाघ्या फाउंडेशनने आक्षेप घेतला होता.मनपाद्वारे गोवंशीय जनावरांचा होणारा लिलाव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी वाघ्या फाउंडेशनचे अध्यक्ष व मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली हाती.
तसेच आज सुमित वर्मा महापालिकेत आयुक्त शंकर गोरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून जोपर्यंत लिलाव प्रक्रिया थांबवण्याचे पत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार होते. मात्र योगायोगाने आज महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा चालू होती. सभेसाठी आलेल्या शिवसेनेचे नगरसेवक गणेश कवडे आणि सुमित वर्मा यांची चर्चा होऊन गणेश कवडे यांनी या प्रश्नाबाबत महानगरपालिकेच्या सभेत प्रश्न उपस्थित करत कायद्यानुसार अशी गोवंश जनवारे मनपा प्रशासन लिलाव करू शकत नाही तसेच ही जनावरे शेतकऱ्यांऐवजी कत्तलखान्यात गेली तर याला जबाबदार कोण असा सवाल करत या लिलावला विरोध केला.
या प्रश्नावर महानगरपालिकेचे उपायुक्त डांगे यांनी उत्तर देताना जर कोणी गोवंशयिय जनावरांची जबाबदारी घेत असेल तर आपण त्यांना जनावरांची देखभाल करण्याची जबाबदारी देऊ अशी तयारी दर्शवली त्यानुसार महानगरपालिकेच्या महासभेत महापौर रोहिणी शेंडगे उपमहापौर गणेश भोसले आणि गणेश कवडे आणि इतर नगरसेवकांनी केलेल्या चर्चेनंतर ही गोवंशीय जनावरे वाघ्या फाऊंडेशनला देण्यात यावी असा ठराव करण्यात आला.
त्यामुळे १७ जानेवारीला होणारा जनावरांचा लिलाव आता रद्द झाला असून वाघ्या फाऊंडेशनच्या पाठपुरव्याला आणि गोवंशीय जनावरांना वाचवण्यात मोठे यश आले आहे.