अहमदनगर दि ६ एप्रिल
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु केली होती. या मोहीमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम किरीट सोमय्या यांनी लाटली. हा पैसा त्यांनी २०१४ ची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला. हा घोटाळा करून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी देशाच्या संरक्षणव्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा केली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शहर शिवसेना युवसेनेच्या वतीने करण्यात आली
गुरुवारी सकाळी नगर पुणे रोड वरील इम्पिरीयल चौकात किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यात आला त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले किरीट सोमय्या यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या ईडी भाजपचा घरगडी…विक्रांत चे पैसे हडपणारा कोण….? मुलुंडचा चोर… महागाई वाढती आहे मस्त, मोदी, शाह महाराष्ट्रात ईडी, इन्कम टॅक्स कारवाई करण्यात व्यस्त…
ह्या घोषणाही आंदोलनाच्या प्रसंगी देण्यात आल्या.
या वेळी संजय शेंडगे, मा. महापौर भगवान फुलसौंदर शहर प्रमुख संभाजी कदम, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोडेे, मा.महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक दत्ता कावरे, नगरसेवक अप्पा नळकांडे, सुरेश तिवारी, नगरसेवक प्रशांत गायकवाड , शिवसेना जिल्हा प्रमुख आशाताई निंबालकर, नगरसेवक विजय पाठारे , संतोष गेनाप्पा, शिवसेना महिला शहर प्रमुख गोयल ताई, सचिन धेंड, अक्षय कातोरे, संतोष तंपुरे, बंटी खैरे, काका शेळके, प्रणव भोसले, उमेश काळे, प्रमोद जाधव, बाप्पु बनकर, दादा क्षिरसागर उपस्थित होते.
विक्रांत युद्धनौका भंगारात काढण्याचा निर्णय झाला तेव्हा किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. महाराष्ट्र सरकारला राष्ट्रीय भावना नाही, असे टीकास्त्र त्यांनी सोडले होते. राज्य सरकारला विक्रांत युद्धनौका वाचवता येत नसेल तर आम्ही त्यासाठी पैसा जमा करू, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते.
त्यानंतर किरीट सोमय्या यांच्या नेतृत्त्वाखाली ‘सेव्ह विक्रांत’ या उपक्रमातंर्गत पैसे जमवण्यास सुरुवात झाली. चर्चगेटपासून अंबरनाथपर्यंतच्या रेल्वे स्थानकांवर किरीट सोमय्या यांच्या लोकांनी डबे फिरवून पैसे गोळा केले. या माध्यमातून ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता. ही रक्कम आपण राजभवनाकडे सुपूर्द करू, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले होते. मात्र, माहिती अधिकारातंर्गत राजभवन कार्यालयाला तशी विचारणा केली तेव्हा आमच्याकडे असे कोणतेही पैसे जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार करून पैसे हडप केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.