अहमदनगर दि.१६ जुलै
अहमदनगर शहरातील बाबा बंगाल दर्गा मज्जिद कबरतान पब्लिक ट्रस्टच्या जागेवर असलेल्या अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर काही लोकांनी दगडफेक केली या घटनेनंतर आता अनेक बाबी उघड होत असून मुळात सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण दाखल असताना आणि जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना आणि याबाबत बाबा बंगाल दर्गा मज्जिद ट्रस्टच्या वतीने महानगरपालिकेला लेखी पत्र देऊन आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय आहेत याबाबतच्या कागदपत्रे देऊनही महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने हे अतिक्रमण काढायची जिम्मेदारी घेतली कशी असा प्रश्न उपस्थित होतोय.या प्रभागाचे प्रभाग अधिकारी संशयांच्या भवऱ्यात सापडले असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मनपा आयुक्तांकडे करणार असल्याची माहिती बाबा बंगाल दर्गा मस्जिद कब्रस्तान पब्लिक ट्रस्टच्या सभासदांनी दिली आहे.
मनपाच्या कै. बाळासाहेब देशपांडे उद्यानातील १३ सौर पथदिवे गायब झाल्याप्रकरणी शिवसेनेच्या आंदोलनानंतर महापालिकेचे तत्कालीन उद्यान विभागप्रमुख तसेच विद्यमान प्रभाग अधिकारी मेहेर लहारे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
त्यानंतर आता त्यांना झेंडीगेट प्रभाग अधिकारी म्हणून पुन्हा एकदा नेमणूक देण्यात आली होती मात्र बाबा बंगाल दर्गा अतिक्रमणाबाबत त्यांची भूमिका संशयस्पद असल्याचा आरोप ट्रस्टच्या सदस्यांनी केला आहे. याबाबत मेहर लहारे यांची चौकशी करून यामध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता ट्रस्टी मनपा आयुक्तांकडे करणार आहेत.
या प्रकरणात दगडफेकीचे घटना घडली होती मात्र त्याप्रकरणी त्या अधिकाऱ्याने तातडीने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन गुन्हा दाखल केला मात्र तो गुन्हा सुद्धा चुकीचा दाखल करण्यात आला असून त्या अधिकाऱ्याने त्यावेळी कोणाकोणाला फोन केले आणि त्यांना कोणी कोणी फोन केले याबाबतही चौकशी करणे गरजेचे आहे. कारण एवढ्या लोकांमध्ये त्या अधिकाऱ्याला दगडफेक करणाऱ्यांची नावे पत्यासह कसे माहीत असतील हा प्रश्न समोर येत आहे.ज्या लोकांनी खरच दगडफेक सुरू केली त्या लोकांवर गुन्हे दाखल न होता जे लोक दगडफेक करू नका असे सांगण्यात गेले अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असा आरोप बाबा बंगाल ट्रस्टच्या सदस्यांनी केला आहे.