अहमदनगर दि.२६ जुलै
अहमदनगर शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून यामुळे अनेक अपघात होत आहेत तसेच याआधीही या मोकाट कुत्र्यांनी लहान मुले, वयोवृद्ध नागरिक यांच्यावर हल्ले केले आहेत. या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात नगर शहरात एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मध्यंतरीच्या काळात मोकाट कुत्रे पकडण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने कार्यवाही करण्यात येत होती मात्र पुन्हा एकदा ही कारवाई ठप्प झाल्याने नगर शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रश्न बाबत माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महानगरपालिका प्रशासनाला एक पत्र देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट होत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.या प्रश्नाबाबत अनेक नागरिक माझ्याकडे तक्रार करत असून महानगरपालिकेमार्फत कुत्रे पकडण्यासाठी एजन्सीची नेमणुक केलेली आहे. कुत्रे पकडण्याबाबतची तक्रार संबंधीत विभागाकडे केली असता सदर एजन्सीने कुत्रे पकडण्याचे काम बंद ठेवलेले असल्याचे उत्तर देण्यात येत असल्यामुळे तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे कुत्रे पकडण्याच्या एजन्सी बाबत शहानिशा करून लवकरात लवकर कुत्रे पकडण्याची व्यवस्था पुर्ववत सुरू करावी.अन्यथा याबाबत कोणतीही दुर्घटना घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. याबाबत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही माझे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महानगरपालिकेला निवेदनाद्वारे दिला आहे.