अहमदनगर दि.२५ जुलै
अहमदनगर शहरातील नालेसफाई आता वादात सापडली असून उपनगरातील नाले सफाईच झाली नसल्याचा आरोप सावेडी उपनगरातील काही नगरसेवकांनी केला आहे. पावसाळ्या आधीच ही कामे सुरू होत असतात. पावसाळ्यात नाल्यांमध्ये तसेच छोट्या ओढ्यांमध्ये पाणी साचून ते नागरी वसाहतीत घुसू नये अथवा त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होऊ नये यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करून नालेसफाई होत असते. मात्र यावर्षी सावेडी उपनगरातील काही नाल्यांमध्ये साफसफाई झाली नसल्याचा आरोप पुराव्यासह नगरसेवक विनित पाऊलबुद्धे, निखिल वारे, बाळासाहेब पवार यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे केला आहे.
अहमदनगर शहरात सध्या जरी पाऊस नसला तरी परतीचा पाऊस अहमदनगर शहरात पडत असतो त्यामुळे नालेसफाई झाले नाही तर याचा त्रास नागरिकांना होणार असल्यामुळे तातडीने नालेसफाई करून घ्यावी तसेच ज्या ठेकेदाराला नाले सफाईचे काम दिले आहे त्याचे बिल नालेसफाई होईपर्यंत अदा करू नये अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
तर ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार हे काम माझे नसून मी महानगरपालिकेला जेसीबी भाड्याने दिला आहे. दिवसभराच्या दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेचे जे काम करावयाचे आहे ते करून घेणे हे काम त्यांचे असताना माझे बिल रोखून माझ्यावर अन्याय केला जात असल्याचं ठेकेदारांच म्हणणं आहे.