अहिल्यानगर दिनांक ९ जून –
दिवसेंदिवस शहराचा विस्तार होत आहे. लोकसंख्या वाढत आहे. त्याच प्रमाणात सेवा व सुविधांची मागणीही वाढत आहे. त्यासाठी महानगरपालिकेची सेवा व सुविधा पुरवणारी यंत्रणा बळकट असणे आवश्यक आहे. याच दृष्टिकोनातून राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शहरातील ड्रेनेज लाईन, चेंबरची तत्काळ व अधिक प्रभावीपणे साफसफाई होण्यासाठी महानगरपालिकेला अत्याधुनिक वाहने उपलब्ध करून दिली आहे. या वाहनांमुळे नागरिकांच्या तक्रारीवर तत्काळ कृती होऊन त्यांच्या समस्याही तत्काळ सोडवता येतील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सक्शन अँड जेटिंग वाहनांचे लोकार्पण आमदार संग्राम जगताप व आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या हस्ते सोमवारी महानगरपालिकेत पार पडले. दोन वाहने उपलब्ध झाली असून, ७ टन क्षमतेच्या वाहनाचे लोकार्पण सफाई कामगारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपायुक्त संतोष टेंगळे, विजयकुमार मुंडे व महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, महानगरपालिका आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या समस्या सोडवते. मात्र, अनेकवेळा साधन सामग्री अथवा अद्ययावत मशिनरी नसल्यामुळे समस्या सोडवताना अडथळे येतात किंवा उपाययोजनांसाठी वेळ लागतो. त्यामुळे महानगरपालिकेची यंत्रणा अत्याधुनिक साहित्य, साधन सामग्रीसह सज्ज असणे आवश्यक आहे. त्यामुळे हे नवीन वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, या काळात निर्माण होणाऱ्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी याचा प्रभावीपणे वापर होईल, असा विश्वासही आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे म्हणाले की, ड्रेनेज लाईन, चेंबर साफसफाईसाठी ही गाडी राज्य शासनाकडून आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. १८.५० टन क्षमतेच्या या वाहनात तीन प्रकाराच्या सुविधा उपलब्ध आहेत. ड्रेनेज, चेंबरमधील मैला उपसा करून त्यावर या गाडीतच प्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रक्रिया होऊन उपलब्ध होणारे पाणी जेटिंगसाठी वापरता येते. त्यासाठी वाहनात नव्याने पाणी भरण्याची आवश्यकता नाही. या वाहनात ८ हजार लिटर क्षमतेची टाकी आहे. दुसरे वाहन ७ टन क्षमतेचे असून त्यात ३ हजार लिटर क्षमतेची टाकी आहे. वाहन चालक व कर्मचाऱ्यांना उत्तमरीत्या प्रशिक्षण देऊन तयार केलेले आहे. या वाहनामुळे कुठलाही भार महानगरपालिकेवर पडणार नाही. थ्री इन वन वाहन असल्याने व प्रतिदिन सलग आठ तास काम करण्याची या गाडीची क्षमता असल्याने नागरिकांच्या समस्या वेळेत व अधिक चांगल्या पद्धतीने सोडवता येतील.