अहमदनगर दि.४ ऑगस्ट
अहमदनगर शहरात बुधवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली मात्र पावसाळ्याच्या सत्रात प्रथमच एवढा मुसळधार पाऊस झाला असून या पावसाने शहरातील अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते.पूर्वीचे नैसर्गिक ओढे नाले बुजवल्याने त्याचा फटका कालांतराने आता बसू लागला असून नैसर्गिक पाणी वाहून जाण्याचा स्त्रोत नसल्याने हे पाणी आता घरांमध्ये घुसू लागले आहे. गुलमोहर रोड परिसरातील नरहरी नगर भागात अक्षरशा घराघरांमध्ये पाणी घुसले होते नाल्याचे पाणी थेट घरांमध्ये घुसल्याने घरातील साहित्य पाण्यावर तरंगतानाचे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळाले.
शीला विहार परिसरातून येणारा नैसर्गिक असणारा एक मोठा नाला नरहरी भागातून पुढे जात तो थेट सीना नदीला जोडला जायचा. मात्र हा नाला हळूहळू नळी मध्ये रूपांतरित झाल्याने आणि अनेक ठिकाणी बुजवला गेल्याने सखोल भागात असलेल्या नरहरी नगर परिसरात काही घरांना दरवर्षी जोरदार पाऊस झाला की घरामध्ये पाणी घरात घुसण्याचा त्रास होत आहे. मात्र पूर्वीच्या काळाचा नाला कुठे गायब झाला याबाबत महानगरपालिका शोध घेण्यास तयार नाही. नैसर्गिक नाले बुजवले गेल्यास त्याचा फटका काही दिवसांनी बसतो याचे ताजे उदाहरण नरहरी नगर मधील बुजवला गेलेल्या नाल्यामुळे समोर आले आहे.
जोरदार पावसामुळे काही ठिकाणी दुकानांमध्ये कमरे इतके पाणी साचले होते हे पाणी मोटारच्या साह्याने बाहेर काढण्याचे काम सुरू असून घरातील अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने रात्री उशिरा नरहरी नगरमध्ये धाव घेऊन पाणी काढण्यासाठी तसेच नागरिकांच्या घरातील गरजेच्या वस्तू पाण्यापासून वाचवण्यासाठी सुरक्षित स्थळी हलवण्यास मदत केली. महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने पाठवले होते मात्र संपूर्ण रात्र पाणी वाहत असल्याने नागरिकांची मात्र मोठी तारंबाळ उडाली.