अहमदनगर : दि.१६ ऑगस्ट
देशात पूर्वी जनतेला ईडी, इन्कमटॅक्स काय असतं हे फारसं माहीत नव्हतं. मात्र आज जो कोणी सरकार विरोधात बोलेल त्याला नोटीस पाठवून दाबलं जातं आहे. तरीही बोलला तर तुरुंगात टाकले जात आहे. दहशतवाद निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. सत्तेसाठी काहीही हे भाजपच ब्रीदवाक्य आहे, अशी सडकून टीका माजी मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर केली आहे.९ ऑगस्ट पासून नगर शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या काँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रा व संवाद कार्यक्रमाचा समारोप नगर शहरामध्ये झाला. त्यावेळी आ. थोरात बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. अपघातात निधन पावलेल्या विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, संगमनेर नगराध्यक्ष दुर्गा तांबे, सचिन गुजर, करण ससाने, प्रताप शेळके, राजेंद्र नागवडे, ज्ञानदेव वाफारे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, दशरथ शिंदे, उषा भगत, अभिनय गायकवाड, प्रवीण गीते, सुजित क्षेत्रे, निलेश चक्रनारायण, उमेश साठे, राणी पंडित, प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, माजी नगरसेवक फैय्याज शेख, मोहनराव वाखूरे, स्वप्निल पाठक, निजाम जहागीरदार यांच्यासह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरुवातीला आकाशात रंगीबेरंगी फुगे आ. थोरात यांच्या हस्ते सोडण्यात आले. सभेला संबोधित करताना थोरात म्हणाले की, वर्षाला दोन कोटी नोकऱ्या युवकांना देऊ असं खोटं सांगितलं गेलं. पंधरा लाख देण्याची फसवी घोषणा केली गेली. आज देशात प्रचंड महागाई वाढली असून डिझेल, पेट्रोल, गॅस, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. पूर्वी भाजप थोडी जरी दरवाढ झाली तर रस्त्यावर यायचे. पण आता ते कुठे गायब झाले आहेत हे माहीत नाही.
थोरात पुढे म्हणाले की, सध्या फक्त बनवाबनवी सुरू आहे. जाती-जातीत, धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. धर्माच्या नावाखाली विभाजन सुरू आहे. महागाई वरून लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे प्रकार अवलंबले जात आहेत. मात्र काँग्रेसने देशाला माहिती अधिकार कायदा, रोजगार हमी कायदा, अन्नसुरक्षा कायदा यासारखे अनेक महत्त्वपूर्ण कायदे दिले. देशाच्या प्रगतीचा इतिहास लिहिताना काँग्रेसचे नाव सुवर्ण अक्षरांनीच लिहावे लागेल, असे थोरात यावेळी म्हणाले.यावेळी आ.तांबे, आ. कानडे, किरण काळे, सचिन गुजर, उत्कर्षा रूपवते यांची भाषणे झाली.
काळेंच्या नियोजनाचे कौतुक :
सत्ता बदलानंतर आजी-माजी महसूल मंत्री एकाच दिवशी नगर शहर दौऱ्यावर होते. त्यामुळे अनेकांचे लक्ष याकडे लागले होते. यानिमित्ताने सत्ता बदलल्यानंतर पहिल्यांदाच नगर शहरात आलेल्या माजी मंत्री थोरात यांचे जोरदार स्वागत किरण काळे यांनी मेळावा घेत केले. काँग्रेसच्या शहरातील सभेचे नियोजन काळे यांनी केले होते. अनेक वर्षानंतर नगर शहरामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला. पाऊस सुरू असून देखील नगर शहराच्या विविध भागातून शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित होते. शहरातील युवक मोठ्या संख्येने काळे यांचे नेतृत्वाखाली टूव्हीलर रॅलीने सभास्थळी पोहोचले. काळे यांच्या नियोजनाचे यावेळी आ.थोरात यांनी भरभरून कौतुक केले.
ट्राफिक, पावसामुळे ऐनवेळी बदल :
भुईकोट किल्ला येथे जात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला अभिवादन करत सावेडीतील श्रीराम चौक ते मेळावा स्थळापर्यंत पदयात्रा काढली जाणार होती. मात्र किल्ला परिसरात ट्राफिक जाम असल्यामुळे तसेच मेळावा असणाऱ्या सावेडी उपनगरामध्ये अधून सुरु असणाऱ्या पावसामुळे नियोजनामध्ये संयोजकांना आयत्यावेळी बदल करावा लागला.