अहमदनगर दि.१ मे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या राज्यात मी एकटाच हिंदुधर्माचा रक्षक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. भगवे वस्त्र, शाल वापरणे व पक्षाच्या झेंड्यावर शिवमुद्रेच्या चिन्हाचा वापर करणाऱ्या राज ठाकरे यांना छत्रपती शिवरायांचा मात्र सोयीस्कर विसर पडला आहे. संभाजीनगरकडे जाताना नगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या चौकात कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी त्यांचा ताफा थांबला होता. परंतू, राज ठाकरे यांनी समोरच असलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष केले. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन न करताच ते निघून गेले. या मुद्द्यावरून नगर शहर शिवसेनेने राज ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत.
हेच का यांचे हिंदुत्व? हे कसले शिवप्रेमी? असा सवाल करत नगर शहर शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम मनसेसह राज ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे.
राज ठाकरे हे महाराष्ट्र दिनी संभाजीनगर येथे जाहीर सभा घेत आहेत. कुठलेही निमित्त नसताना केवळ राजकीय सुपारी घेऊन राज ठाकरे हे मागील काही दिवसांपासून राज्यात जातीय तणाव निर्माण करत आहेत. राज ठाकरे यांचा बोलविता धनी कोण हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सत्तेशिवाय तडफडणाऱ्या भारतीय जनता पार्टीला काहीही करून केंद्राचे अपयश झाकायचे आहे. प्रचंड वाढलेल्या महागाईत संपूर्ण देशातील जनता होरपळत आहे. या महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष व्हावे, देशातील फेकू मोदी सरकारचे अपयश झाकले जावे, यासाठी मागील विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही मनसे खाल्ल्या मिठाला जागून जनतेची दिशाभूल करत आहे.
राज्यात सण उत्सवाच्या काळात अशाप्रकारे तेढ निर्माण करून, इतरत्र लक्ष विचलित व्हावे, यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. युवकांची माथी भडकावणे, हिंदू समाजात फूट पाडणे व सामाजिक सलोखा धोक्यात आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मनसे व भाजपकडून सुरू आहे.
विशेष म्हणजे, स्वतःला हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा रक्षक दाखवण्याचा व शिवसेना अध्यक्ष तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांची बरोबरी करण्याचा केविलवाणा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. ज्या हिंदुत्वाचा आधार घेऊन राज ठाकरे हे स्वतःचा स्वार्थी राजकीय अजेंडा पुढे रेटत आहेत, त्या हिंदुत्वाचे मूळ रक्षक व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा सोयीस्कर वापर राज ठाकरेंकडून होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
नगर शहरातून संभाजीनगरकडे जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभे असतानाही महाराजांना अभिवादन न करताच राज ठाकरे संभाजीनगरकडे निघून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांना विसर पडला की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे बेगडी हिंदुत्व प्रेम दाखविऱ्यांना जनता थारा देणार नाही, मनुष्याच्या व राज ठाकरे यांच्य हिंदुत्वाबाबतच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही, अशा शब्दात संभाजी कदम यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राज ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत.