अहमदनगर दि.८ ऑगस्ट
सावेडीत नव्याने बांधकामे झालेल्या ठिकाणी पाणी साचते आहे. या पाण्याचा निचरा होण्यासाठी मालमत्ता धारकांनी आपापल्या बांधकामांच्या प्लिंथ उचलून घाव्यात असा जावई सल्ला अहमदनगर महानगरपालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे. त्यावर आता चहू बाजूनी जोरदार टीका होत आहे. त्यासोबत डांगे यांच्या ज्ञानाचे आणि अकलेचे वाभाडे अतिशय वाईट पद्धतीने काढण्यात येत आहेत.
या परिसरात ज्यांनी खास पालिकेची परवानगी घेऊन नैसर्गिक ओढे नाले आणि पाणी निचरा होण्याचे स्रोत बुजवून त्यावर बेकायदेशीर पणे बांधकाम केले. आणि पालिकेच्या नगर रचना तसेच बांधकाम विभागाने त्यास टेबलाखालून चिरीमिरी घेऊन अनधिकृत बांधकामे देखील अनधिकृत करून दिली त्या बांधकामांना अभय देण्यासाठी डांगे यांनी हा डाव टाकला आहे का असा सवाल शिवसेना उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी विचारला आहे. आहे त्या जागेवरून पाण्याचा निचरा होण्यासाठी तुमचे राहते घरच उचलून घ्या आणि खालून पाणी जाऊ द्या असा शोध या आधी कोणत्या पालिकेने लावला ते तरी दाखवा असे त्यांनी म्हंटले आहे.
मागील दोन आठवडे नगर शहरात झालेल्या मुसळधार पावसाने नगर करांची अक्षरशः त्रेधा तिरपीट उडवून दिली आहे. नगर शहरातील रस्त्यांची अवस्था अगदी नांगरलेल्या शेताप्रमाणे झाली आहे. त्यामुळे त्यांनी पावसात नगरच्या रस्त्यावर येणे टाळले . पण त्यांचे घरात बसणे देखील कुणाच्या डोळ्यात खुपले कि काय म्हणून मध्यंतरी झालेल्या पावसाचे पाणी घरात शिरल्यानंतर ते पाणी बाहेर काढण्यातच नागरिकांना रात्रीचा दिवस करावा लागला.
या संदर्भात काही नगरसेवक पालिकेत तक्रारी घेऊन आले. अगदी पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली तेव्हा नगर शहरात विशेषतः सावेडीत ओढे नाले बुजवून त्यावर बांधकामे झाली आणि त्यामुळे पाणी घरात शिरते आहे हा विषय समोर आला. मग आपले उपायुक्त डांगे यांनी या बांधकाम धारकांना त्यांच्या प्लिंथ उचलूनघ्यायला सांगा असा सात्विक सल्ला दिला.
खरेतर या बांधका मांना नगरच्या पालिकेच्या संबंधित विभागाने चिरीमिरी घेऊन परवानगी दिली असावी अन्यथा उपायुक्त डांगे यांनी आपल्या अधिकारात अशी बेकायदेशीर बांधकामे तात्काळ पाडावीत आणि या भागात नसर्गिकपणे साचणाऱ्या पाण्याची वाट मोकळी करावी असा शास्त्रीय अभियांत्रिकी सल्ला दिला असता परंतु तसे न करता पालिकेने ओढे नाले बुजवून ज्या बांधकामांना बेकायदेशीर पणे परवानगी दिली आहे. ती देखील रद्द होऊ नये, परवानगी दिलेल्या मालमत्ता धारकाकडून ओरड होऊ , तसेच प्रत्येक पावसाळ्यात साचत असलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी डांगे यांनी बांधकामांची प्लिंथ उचलण्याची शेखचिल्ली शक्कल शोधून काढली . त्यांचा हा सल्ला म्हणजे पालिकेत सुरु असलेल्या चिरी मिरी खोरीला अधिक वाव देण्याचा प्रकार आहे.
येत्या काळात पावसाचा जोर वाढणार आहे. सावेडीच्या काही भागात पाणी साचून ते रहिवाश्यांचा घरात शिरले आहे. पुढील कालावधीत परिस्थिती हाताबाहेर जाऊन पूर परिस्थिती मुळे जीवित व मालमत्तेची हानी मोठ्या प्रमाणात होउ शकते त्यामुळे अशी ओढे नाले बुजवून त्यावर झालेल्या अनधिकृत बांधकामांची परवानगी रद्द करून ती बेकायदेशीर ठरवावीत आणि ते पाडण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी जाधव यांनी केली आहे.