अहिल्यानगर दिनांक २७ डिसेंबर
मुकुंदनगर हा परिसर मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्या मागे उभा राहिला होता तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अभिषेक कळमकर यांना आणि तुतारी या चिन्हाला भरभरून पाठिंबा दिला होता.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडूनही येथील मतदारांनी शरद पवार गटालाच पसंती दिली होती.
मात्र महानगरपालिका निवडणूक २०२५ मध्ये घडलेले चित्र सर्वांनाच धक्का देणारे ठरले आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला मुकुंदनगरमध्ये एकही जागा मिळाली नाही. विशेष म्हणजे ज्या काँग्रेस पक्षाचा या भागात फारसा जनाधार नाही, त्या काँग्रेसला येथे चारही जागांवर तिकीट देण्यात आल्या असल्याची चर्चा आहे.
या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.जनतेतून प्रश्न उपस्थित केला जात आहे की —
“ज्या काँग्रेस पक्षाला येथे कधीच मजबूत पाठिंबा नव्हता, त्यांनाच मुकुंदनगरसारख्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सर्व तिकिटे देण्यामागचे नेमके कारण काय?”
राजकीय जाणकारांच्या मते, तिकीट वाटपातील धोरणात्मक चूक, स्थानिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष आणि जमीनीवरील राजकारणाचा योग्य अंदाज न घेतल्यामुळे हा फटका बसल्याची चर्चा आहे.
एकेकाळी तुतारीचा बुलंद निनाद ऐकू येणाऱ्या मुकुंदनगरमध्ये आज राष्ट्रवादीला पूर्णपणे बाहेर फेकले जाणे ही घटना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.याची जबाबदारी कोण घेणार? आणि आगामी निवडणुकांत याचा काय परिणाम होणार? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.





