अहमदनगर दि.१७ ऑक्टोबर
कापड बाजारातील पथकर विक्रेत्यांचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला असून यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. व्यापाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी याबाबत आंदोलन आणि उपोषण केले होते. तत्कालीन आयुक्त शंकर गोरे यांनी अतिक्रमण कायमस्वरूपी काढू असे आश्वासन दिल्यानंतर व्यापारांनी उपोषण सोडले होते.मात्र त्यानंतर पुन्हा मागील आठवड्यात व्यापारी महासंघाने पथकर विक्रेत्यांना कापड बाजारातून हटवा आणि इतर ठिकाणी जागा द्या अशी मागणी केली.त्यानंतर बुधवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोहीम राबवून काही लोकांच्या हातगाड्या जप्त करण्याची कारवाई केली मात्र यावेळी सुद्धा ठराविक लोकांचे चेहरे पाहून अतिक्रमण विभागाने कारवाई केली असा आरोप छोट्या व्यापाऱ्यांनी केला होता.
२६ एप्रिल २०२२ रोजी तत्कालीन आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीत महापालिकेत शहर पथ विक्रेता समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती.बैठकीस उपायुक्त (सा), पोलीस निरीक्षक एम.एल पेंडम, संपत शिंदे, शहर अभियंता, वैदयकीय आरोग्य अधिकारी, प्रभाग अधिकारी फेरीवाला समिती सदस्य संजय झिंजे शाकीर शेख, शोभा ढेपे,ज्योती केसकर, ताई शिंदे, आजम शेख एन .एम बेल्हेकरउपस्थित होते.या बैठकीत सर्व सदस्यांच्या संमतीने कापड बाजार, मोची गल्ली व शहाजी रोड व परिसरातील पथ विक्रेत्यांसाठी चार बाय चार फुट जागा व्यवसायसाठी देण्याचे निश्चीत करण्यात अली असल्याची माहिती समजत आहे.
मात्र कापड बाजार हा नॉन हॉकिंग झोन असल्यामुळे या ठिकाणी पथकर विक्रेत्यांना जागा देऊ शकत नाही तसा हायकोर्टाचा निर्णय असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत माहिती दिली असून 2017 मध्ये एका सूनवणी दरम्यान कोर्टाने असे नमूद केले आहे की “कोणत्याही प्रार्थनास्थळापासून, पवित्र मंदिरापासून, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांपासून किंवा कोणत्याही महानगरपालिकेपासून 150 मीटरच्या आत किंवा इतर बाजारपेठा किंवा कोणत्याही रेल्वे स्थानकावरून. तसेच फूटब्रिज आणि त्यापेक्षा जास्त ठिकाणी फेरीवाला परवानगी दिली जाणार नाही, असे निर्देश देण्यात आले आहेत हे स्पष्ट करण्यात आले आहे की प्रार्थनास्थळांच्या बाहेरील फेरीवाल्यांना केवळ अशाच वस्तू विकण्याची परवानगी दिली जाऊ शकते ज्यांची आवश्यकता आहे.देवतेला अर्पण करण्यासाठी किंवा पूजास्थळी ठेवण्यासाठी भक्त उदा. फुले, चंदन, मेणबत्त्या, अगरबत्ती, नारळ इत्यादी सुप्रीम कोर्टाच्या या आदेश सामाजिक कार्यकर्ते भांबरकर यांनी निदर्शनास आणून दिले असून त्यामुळे आता महापालिका प्रशासन याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पथकर विक्रेत्यांना त्यांच्या हक्काची जागा ही मिळालीच पाहिजे मात्र विनाकारण राजकारण आणि श्रेयवाद यामुळे पथकर विक्रेत्यांचा अक्षरशा फुटबॉल होत चालला आहे. एकीकडे महापालिका प्रशासन त्यांना चार बाय चार जागा देण्याचा ठराव करत असताना न्यायालयाच्या काही निर्देशाकडे कडे दुर्लक्ष करत आहे.भविष्यात यामुळे पुन्हा पथकर विक्रेत्यांना त्रास होऊ शकतो त्यामुळे त्यांच्याबद्दल जो निर्णय करायचा आहे तो कायदेशीर रित्या पूर्ण करूनच त्यांना जागा द्याव्यात की जेणेकरून त्यांना भविष्यात कधीही त्रास होऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली आहे.