अहमदनगर दि.१५ ऑगस्ट
अहमदनगर शहराच्या जवळच असणाऱ्या बोल्हेगाव गावठाण मधील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदाना लगतच्या काही झाडांची कत्तल स्वतंत्र दिनाच्या दिवशीच करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे झाडे लावा झाडे जगवा या पंतप्रधानांच्या तसेच राज्य सरकारच्या आव्हानाला महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांनी हरताळ फासल्याचे समोर आले आहे. साफसफाई च्या नावाखाली गळनिंब तसेच पपई आणि सीताफळाच्या झाडांची कत्तल जेसीबीच्या साह्याने करण्यात आली.
विशेष म्हणजे आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची महानगरपालिकेला सुट्टी असतानाही महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी जेसीबी पाठवला. तसेच हे करत असताना त्या ठिकाणी झाडे तोडण्याचा प्रकार घडला आहे.
स्वतंत्रदिना निमित्त सकाळी झेंडावंदन झाल्यानंतर दुपारी जिल्हा परिषद शाळेच्या परिसराच्या मैदान लागत हा प्रकार घडला आहे. याबाबत आता काही सामाजिक कार्यकर्ते झाडे तोडल्याबद्दल पोलिसात तक्रार देण्याच्या तयारीत आहेत. झाडे लावण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च होत असताना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच झाडे तोडून महापालिका कोणता संदेश नागरिकांना देत आहे असा सवाल या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केलाय.