अहमदनगर दिनांक 21 सप्टेंबर
मंगळवारी सायंकाळी पावसाने चांगलीच बॅटिंग केली त्यामुळे नगर शहरातील सखोल भागात पुन्हा एकदा पावसाचे पाणी साचले होते. यावर्षी नगर शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे नगर शहरातील सखोल भागात पाणी साचल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. नरहरी नगर मध्ये यावर्षी तिसऱ्यांदा नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले आहे. जवळपास गुडघाभर इतके पाणी नागरिकांच्या घरात असल्यामुळे महानगरपालिकेच्या अग्निशामक आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे पाणी उपसण्यासाठी नागरिकांना मदत केली.
मागील महिन्यातच नरहरी नगर आणि आसपासच्या परिसरातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. त्यावेळी आमदार संग्राम जगताप माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर तसेच महानगरपालिकेचे विविध विभागांचे प्रमुख या ठिकाणी येऊन पाहणी करून गेले होते. यावेळी या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक ओढ्यावरचे अतिक्रमण दूर करून ओढा मोकळा करणे गरजेचे होते असे निदर्शनास आल्याने त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी अतिक्रमणे काढून नैसर्गिक ओढा मोकळा केल्याने पाण्याचा प्रवाह व्यवस्थितरीत्या पुढे जाऊ शकतो असे सांगून ओढा अतिक्रमणातून मोकळा करण्याचे आदेशही दिले होते. मात्र या आदेशाला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने केराची टोपी दाखवल्याचं मंगळवारी पुन्हा निदर्शनास आले आहे कारण मंगळवारी झालेल्या पावसामुळे पुन्हा नरहरी नगर मधील नागरिकांच्या घरांमध्ये तसेच आसपासच्या दुकानांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे फक्त पाऊस आल्यानंतर पाहणी करून नागरिकांना आश्वासन देणे एवढेच काम महानगरपालिकेचे असल्याचे दिसून येते.
तर या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर पाणी साचल्याने काही नागरिकांनी थेट महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोन करून याबाबत कळवले मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार आयुक्तांनी जे उत्तर दिलं ते अजबच होतं तुम्हाला ओढ्यात कोणी घर घ्यायला सांगितलं अस उत्तर महानगर पालिकेच्या आयुक्तांनी दिल्याचं या परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून महानगरपालिकेचा नगररचना विभाग यावर ले आउट टाकताना मंजुरी देतअसताना झोपला होता का ? असा प्रतिप्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शहरातील नैसर्गिक ओढे नाले लवकरात लवकर खुले करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. आयुक्तांनी याबाबत घोषणा केली होती मात्र ती घोषणा कागदावरच राहिली का प्रश्न उपस्थित होतेय.