अहमदनगर दि.२७ सप्टेंबर
अहमदनगर शहरातील राजकारण कसे आहे हे आजपर्यंत कोणालाच समजलेले नाही. कोणता पक्ष कोणाबरोबर कधी युती करेल हे कुणीही सांगू शकत नाही. अहमदनगर हे ऐतिहासिक शहर असले तरी अहमदनगर शहरातील राजकारण हे इतिहास घडवणारे नक्कीच आहे. या नगर शहरात महानगरपालिकेत भाजप – राष्ट्रवादीची युती होऊ शकते तर महाविकास आघाडीच्या सरकार आल्यानंतर शिवसेनेला बरोबर घेऊन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाऊ शकतात.
मात्र एकीकडे राज्यात महाविकास आघाडी सध्या तरी अस्तित्वात असली तरी अहमदनगर शहरातील राजकारण हे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या संघर्षाचं राहिले आहे. अहमदनगर शहरात आजपर्यंतच्या सर्वच निवडणुका या शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये चुरशीच्या झालेल्या आहेत. पंचवीस वर्ष नगर शहरावर राज्य करणाऱ्या शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांचं आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे सूत कधीच जुळलेलं नव्हतं. त्यांच्या निधनानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले महापालिकेत जरी महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असली तरी काही नगरसेवक मात्र यापासून अलिप्त असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. महाविकास आघाडीचा धर्म फक्त महापालिकेच्या महापौर पदापर्यंतच निभवण्यात आल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळतं मात्र इतर ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र तर शिवसेना ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत पाहायला मिळते. नगर शहर शिवसेना या नावाच्या शिवसेनेच्या फेसबुक पेजवर सातत्याने राष्ट्रवादी कांग्रेस वर टीका होत असते.
अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद किरण काळे यांना मिळाल्यापासून त्यांनी आपल्या कामाचा झंजावात सुरू केला आहे. तसेच त्यांनी सातत्याने राष्ट्रवादीला निशाण्यावर धरले आहे. तर शिवसेनेला बरोबर घेतल्याचं चित्र नगरकरांनी पाहिले आहे.आता तर काँग्रेसचे कार्यालय थेट चितळे रोडवर आले असून या ठिकाणी लवकरच या कार्यालयाचा शुभारंभ राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते होणार आहे. मात्र या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावर अहमदनगर शहराचे माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांचा फोटो लावण्यात आल्यामुळे शहरात एकच चर्चेचा विषय झाला आहे. यावरूनच किरण काळे यांच्या पुढील राजकारणाची दिशा समजून येत असून याला शिवसेना आता कितपत साथ देणार हे येणार काळच ठरवेल.