पाथर्डी दि.६ एप्रिल
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य व जनावरांच्या बाजार भरणाऱ्या मैदानातील दोन्ही दरवाजे अतिक्रमणामुळे बंद झाले असून यामुळे या ठिकाणी सुरू असलेल्या व्यापारावर व शेती पूरक व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून अतिक्रमणे हटवून प्रवेश द्वार खुले करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी व शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन केले होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दक्षिण बाजूच्या मुख्य गेटचे काम गेल्या सहा महिन्यापासून सुरू असल्याने त्या ठिकाणी ठेकेदाराने बांबूचा अडथळा उभा करून रहदारी रोखण्यात आली आहे तसेच पश्चिम बाजूच्या प्रवेशद्वारावरही अतिक्रमणे होऊन दोन वर्षापासून प्रवेशद्वार बंद आहे. बाजार तळात जाण्यासाठी अरुंद व तोकडा रस्ता असल्याने वाहनांची गर्दी होऊन शेतकऱ्यांना त्यांचा भुसार माल तसेच पशुधन विक्रीसाठी या ठिकाणी सहज रित्या आणता येत नाही त्यामुळे शेतकरी तसेच व्यापारी यांचे फार मोठे नुकसान होत असून याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे.
सदरील दोन्ही प्रवेशद्वार खुले करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी शेतकरी व व्यापार्यासह अचानक पणे बाजार समितीच्या दक्षिण बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ महामार्गावर सकाळी ९ वाजता रास्ता रोको केला. यावेळी आंदोलनात भाऊ टकले,गोरक्ष ढाकणे,गणेश आव्हाड,बाळासाहेब आव्हाड,बाळू खेडकर,बाळू देवकर,बबन देवकर,सौरभ दानापुरे,माऊली घायतडक,शुभम नाहार,प्रवीण गुगळे, ज्ञानेश्वर सांगळे , बंडु लाहोटी,राजेंद्र दानापुरे,संतोष गुगळे,सोमनाथ लाहोटी,संतोष बाफना आदींसह शेतकरी व व्यापारी मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
यावेळी मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बन्सी भाऊ आठरे यांनी गेटवरील अतिक्रमणे हटवून रहदारी सुरळीत केली जाईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.