अहमदनगर दि.२९ डिसेंबर
माजी मंत्री आणि भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या सुपुत्र अक्षय आणि नववधू प्रियांका यांचा शुभ विवाह समारंभ बुधवारी बुऱ्हानगर या ठिकाणी पार पडला. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार स्नेहलता कोल्हे ,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के,माजी मंत्री राम शिंदे, राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्यासह खासदार सुजय विखे ,शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने या विवाहास उपस्थित होते.
तसेच कर्डिले आणि कासार यांच्या कुटुंबीयांचे आप्तस्वकीय आणि मित्रमंडळींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या लग्नातही माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी पाहुण्यांचे स्वागत करताना राजकारणाचा पिंड सोडला नाही. आपल्या मिश्किल स्वभावाचं दर्शन यावेळी त्यांनी दाखवलं मला माझ्या जावयांचा त्रास नाही मात्र माझ्यामुळे त्यांना खूप त्रास होतो असं म्हणत त्यांनी आपल्या जावयाचं कौतुक केलं.
तर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे नवरदेवाला स्टेजवर आणण्याची जबाबदारी असल्याने शिवाजी कर्डिले यांनी सांगितले भाजपचे सर्वच माजी मंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते नवरदेवाची वाट पाहत आहेत त्यामुळे येथे पक्षीय राजकारण न करता लवकरात लवकर मंडपात घेऊन येण्याची विनंती त्यांनी जगताप यांना केली या वक्तव्यावर लग्नसमारंभात एकच हशा पिकला होता. वधू-वरांना आशीर्वाद देताना सर्वच पाहुण्यांनी शिवाजी कर्डिले यांच्या मिश्किल स्वभावासह राजकारणातील एक वेगळं व्यक्तिमत्व असल्याचं नमूद केलं.
हा लग्न सोहळा लॉकडाऊनच्या काळातच करायचा होता मात्र आता कोरोना संपत आल्याने हा विवाहसोहळा आपल्या गावातच मुलाच्या आग्रहाखातर केल्याचं शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.या लग्न सोहळ्यास सुमारे तीन ते चार हजार जणांचा जनसमुदायउपस्थित होता. मात्र सोशल डिस्टन्स आणि मस्कचा अभाव असल्याचं निदर्शनास येत होतं. अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत हा शाही लग्नसोहळा थाटामाटात पार पडला.