Home Uncategorized आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र १४ एप्रिल रोजी आपला ३४ वा वर्धापन साजरा करणार

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र १४ एप्रिल रोजी आपला ३४ वा वर्धापन साजरा करणार

Oplus_131072

अहिल्यानगर दिनांक 12 एप्रिल

ज्ञान ;माहिती आणि मनोरंजन या त्रिसुत्री सोबतच बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन गेली ३४ वर्ष अहिल्यानगर जिल्हावासियांना विश्वासार्ह सेवा देणारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र १४ एप्रिल रोजी आपला ३४ वा वर्धापन दिवस साजरा करतं आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय अखत्यारित असलेल्या प्रसार भारती या स्वायत्त संस्थेअंतर्गत आकाशवाणी ही लोकप्रसारक संस्था देशवासियांसाठी कामं करते.

दररोज सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते रात्री अकरा वाजून दहा मिनिटापर्यंत चिंतन; दिनविशेष; अहिल्यानगर दिनांक ; नारी विश्व ;लोकजागर; प्रासंगिक ; बालमेळा ; किसानवाणी ; कृषिवाणी; युववाणी; साहित्य सौरभ; ओळख कायद्याची; अहिल्यानगरचे अंतरंग; फिरस्ती; व्यक्तिवेध; मानस; आपली आवड; आपकी पसंद; फोन गाणी ; रजनीगंधा; हॅलो गीतबहार; सुहाना सफर; हॅलो डॉक्टर; स्नेहांकित ; लोकसंगीत यांसारखे दर्जेदार कार्यक्रम आजही अहिल्यानगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात घराघरात रेडिओ वर ऐकले जातात. आजही असंख्य श्रोत्यांच्या दिवसाची सुरुवात आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मंगलध्वनी आणि मंगलप्रभातने होते. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमुळे आकाशवाणी आणि श्रोते यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालेला आहे.

काळानुसार न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपच्या माध्यमातून अगदी जगभरात आकाशवाणीचा प्रचार आणि प्रसार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. माहितीच्या मायाजालामध्ये आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येणाऱ्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्रांची विश्वासार्हता आजही टिकून आहे.

14 एप्रिल 1991 साली तत्कालीन अहमदनगर आणि आजच्या अहिल्यानगर शहरात सावेडी भागात स्थापन झालेल्या आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रानं आपली दैदीप्यमान वाटचाल आजही चालू ठेवलेली आहे. कोविड सारख्या महामारीच्या आपत्ती काळामध्येसुद्धा आकाशवाणीने आवश्यक आणि विश्वासार्ह माहिती श्रोत्यांपर्यंत खंड न पडू देता अविरतपणे पोहोचवली.
दहा किलो वॅट एवढी प्रचंड प्रक्षेपण क्षमता असलेला जिल्ह्यातील एकमेव शक्तिशाली प्रक्षेपक आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रात आहे. ग्रामीण भागातील स्थानिक कलाकार; महिला मंडळी;शेतकरी बांधव; शाळेतील- महाविद्यालयातील विद्यार्थी; विद्यापीठातील शास्त्रज्ञ; सामजिक ;साहित्य – सांस्कृतीक क्षेत्रातील मान्यवरांसाठी आकाशवाणी हे एक हक्काचे व्यासपीठ आहे. आकाशवाणी केंद्राकडे जुन्या आणि नवीन गीतांचा प्रचंड मोठा खजिना आहे. यात सुगम संगीत; मराठी – हिंदी चित्रपट संगीत ; भक्ती संगीत ; नाट्यसंगीत ; शास्त्रीय संगीत; गझल; लोकगीतांचा समावेश होतो. दररोज आकाशवाणीचे लाखो श्रोते याचा आवडीने आस्वाद घेतात.

आकाशवाणीला मानणारा ; कार्यक्रमांचा आनंद घेणारा; थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात फोनच्या आणि पत्रांच्या माध्यमातून संवाद साधणारा मोठा रसिक श्रोतावर्ग अहिल्यानगर सोबतच पुणे; छत्रपती संभाजीनगर; नांदेड ;यवतमाळ; अमरावती ; नाशिक; जळगाव ; बीड; सोलापूर ; बुलढाणा; धाराशिव जिल्ह्यांसोबत मध्य प्रदेश ;छत्तीसगड अशा राज्यांत सर्वदूर पसरलेला आहे. न्यूजऑन एआयआर या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम सातासमुद्रापार सुद्धा ऐकले जातात. आकाशवाणीतील कार्यक्रम विभाग ; अभियांत्रिकी विभाग; आणि प्रशासनिक विभाग आकाशवाणीची वैभवशाली परंपरा जपण्याचं; ते वृद्धिंगत करण्याच कार्य नेटाने करतात.
माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यात आजही आकाशवाणीला लाखो श्रोत्यांची पसंती मिळते हे विशेष. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर आकाशवाणी सुद्धा काळ सुसंगत बदल स्वीकारत आहे. त्यानुसार आपलं रूप बदलत आहे. मनोरंजनाचे अनेक माध्यमं सध्या उपलब्ध असताना सुद्धा भविष्यातही आकाशवाणी अनेक दर्जेदार कार्यक्रम ; विश्वासार्ह माहिती श्रोत्यांपर्यंत सदैव पोहोचवत राहिलं असा ठाम विश्वास अहिल्यानगर आकाशवाणी केंद्राचे प्रसारण अधिकारी सुदाम बटुळे यांनी व्यक्त केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version