नवरात्री विशेष
उद्या पासून नवरात्री सुरू होत आहे नवरात्री म्हणजे रंग, परंपरा, संगीत आणि नृत्य ह्यांची रेलचेल असतेच, सोबतच ही वेळ आपली विश्रांतीची, आपल्या अंतरंगात वळण्याची आणि आपल्या आत नवी उर्जा भरून घेण्याची आहे. नवरात्रीच्या काळात उपवास केल्यास आपल्या आतील परमानंद आणि प्रसन्नतेकडे नेणारा प्रवास सुकर होतो. ह्यामुळे मनाची अस्वस्थता दूर होऊन सजगता आणि आनंद वाढू लागतो.
आयुर्वेदानुसार उपवासामुळे आपला जठराग्नी पुन्हा प्रज्वलित होतो. ह्या जठराग्नीतील वाढ आपल्या शरीरातील टाकाऊ विषकण नष्ट करते. हे टाकाऊ विषकण शरीराच्या बाहेर घालविले जातात, त्यामुळे सुस्ती आणि मंदपणा कमी होतो. शरीरातील पेशीपेशीत नवचैतन्य जागृत होते. त्यामुळेच, उपवास हा शरीरशुद्धीसाठी प्रभावी उपचार ठरलेला आहे. जेव्हा शरीर शुद्ध होते, तेव्हा मन सुद्धा अधिक शांत आणि स्थिर होते, कारण शरीर आणि मनाचा गहिरा संबंध आहे.
हा झाला शरीरातील अंतरंग सुदृढ करण्याचा उपवासाचा मंत्र मात्र स्वतःहून व्यसन लावून घेतलेल्या आणि मानसिक स्थिती सह शारीरिक,आर्थिक, सामाजिक परिस्थिती बिघडवण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत एक सवय प्रत्येक मनुष्याने लावून घेतली आहे ती सवय म्हणजे मोबाईल वापराची सवय होय.
मोबाईलचा वापर जेवढा चांगल्या गोष्टीसाठी होत आहे. तेवढाच दुपटीने त्याचा वापर आता वाईट गोष्टींसाठी होऊ लागला आहे.मोबाईल म्हणजे आपल्या घरातील एक सदस्य झाला आहे. या मोबाईलमुळे अनेकांच्या घरात अनेक समस्या उदभवल्या आहेत. एक वेळ घरात माणूस नसेल तर चालेल मात्र मोबाईल असायलाच हवा.मोबाईल मुळे आजकाल लोकं स्वतःहून टेन्शन तयार करायला लागले आहेत. त्यातही आभासी दुनियेत जगू लागली आहेत अगदी पाळण्यात असलेल्या मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत मनुष्य हा मोबाईल शिवाय राहू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. घरात लोक कमी असतील आणि मुलगा लहान असेल तर आई आपले काम सुरळीत होण्यासाठी मुलाच्या हातात सुरुवातीला कार्टून लावून मोबाईल देते आणि हळूहळू ही सवय वाढत जाते त्याचप्रमाणे ऑनलाइन शिक्षणामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात मोबाईल आला आहे फावल्या वेळात तो या मोबाईल मध्ये गेम आणि सोशल मीडियावर आपला वेळ घालवतो आणि त्या आभासी दुनियेत रमून जातो. आता तर सध्या रील आणि टिक टॉक सारखे अनेक फिचर सोशल मीडियावर आल्याने तरुण तरुणींसह महिला पुरुष वृद्ध असे सर्वजण या रीलच्या आहारी गेले आहेत. आपली कलाकृती सादर करताना आपण यामध्ये कुठेतरी गुरफटत चाललोय याचं भानही त्यांना राहत नाही.
आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण सोशल मीडियावर टाकण्याची घाई आजकाल अनेकांना असते सकाळी उठल्यापासून तर रात्रीच्या झोपेपर्यंत क्षणाक्षणाचे अपडेट सोशल मीडियावर पडली नाही आणि त्याला लाइक्स किंवा कमेंट्स आले नाही तर त्यांची तळमळ ही बघण्यासारखी असते. आपलं संपूर्ण जीवन हे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून दुसऱ्यांच्या हवाली करतोय हे त्यांना समजूनही येत नाही.
मोबाईल, सोशल मीडियाच्या वापरातून, लोकं स्वतःहून आभासी ताण निर्माण करताहेत या आभासी दुनियात मनुष्य आत्महत्या करण्यापासून ते दुसऱ्याचा खून करण्यापर्यंतची मजल मारत आहे पैसा अब्रू मानसिक संतुलन ताणतणाव शांतता या सगळ्या गोष्टी मोबाईल मुळे आपोआप मनुष्याच्या जीवनात येत आहे. त्यामुळे आता मोबाईल उपवास हा एक नवीन ट्रेड सध्या काही काळापासून सुरू झाला आहे.
2016 मध्ये कोल्हापुरातली छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अॅण्ड रिसर्च ही उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थेच्याच दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दीपक भोसले यांच्या मनात या मोबाइलच्या उपवासाची कल्पना आली. मोबाइल न वापरता, त्याचा उपवासच करण्याच्या या आपल्या कल्पनेला कुणी साथ देईल असं त्यांना प्रथम वाटलं होतं मात्र हा त्यांचा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला आणि कॉलेजमध्ये मोबाईल उपवासाचा प्रयोग सुरू झाला यामुळे कट्ट्यावर पुन्हा गप्पांचे फड रंगू लागलेत. परस्पर संवाद वाढतोय.वर्गात शिक्षक शिकवत असताना मोबाइल न वापरल्यानं अभ्यासाकडेही लक्ष वाढलंय. एरव्ही उपवास धार्मिक कारणांसाठी, श्रद्धेपायी केला जातो आता नव्या डिजिटल काळात मोबाइलचा उपवास करण्याची काळाची गरज आहे.
त्याच प्रमाणे मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील बेगमगंज येथील या पर्युषण उत्सवात जैन भिक्खूंसमोर अनोख्या उपवासाची संकल्पना ठेवण्यात आली होती. या उपवासाची शहरात जोरदार चर्चा झाली असून मोबाईल पासून दूर राहण्यासाठी या उपवासाला डिजिटल फास्टिंग असे नाव देण्यात आले आहे. जैन समाजाचे अध्यक्ष अक्षय जैन सांगतात की, आजकाल प्रत्येक व्यक्ती, तरुण आणि महिला इंटरनेटच्या व्यसनाच्या आहारी गेल्या आहेत. माणूस कुठे एकांतात आणि शांततेत राहू शकत नाही आणि सर्वात अडथळा आणणारी गोष्ट म्हणजे मोबाईल असून या मोबाईलचा व्यसन दूर करण्यासाठी यावर्षीपासून डिजिटल फास्टिंग ही संकल्पना राबविण्यात आली आहे यामध्ये आपला स्वतःचा मोबाईल 24 तासात करता स्विच ऑफ करून मंदिरामध्ये ठेवण्यात येतो यामुळे हळूहळू का होईना मोबाईलची सवय कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. याला हजारो युवक युवतीनी महिला पुरुषांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं या ठिकाणी दिसून आलं.
मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेकांना डोळ्याची कानाची व्याधी झाली आहे. तसेच मानसिक तणाव यामुळे डॉक्टरांकडे धाव घ्यावे लागते. अनेक लोक यामुळे विक्षिप्तपणे वागू लागले आहेत अनेक लोकांची बदनामी या मोबाईल मुळे झाली आहे.अनेक लोकांची फसवणूक या मोबाईलमुळे झाली आहे.
भारतीय परंपरेनुसार सोमवार ते रविवार अनेक देव देवतांच्या नावे लोकं वेगवेगळ्या कारणांनी उपास करतात. मात्र या डिजिटल आभासी ताणातून मुक्ती मिळविण्यासाठी, दिवसातून काही काळ आणि शक्य झाल्यास एखादा दिवस डिजिटल फास्ट अर्था ‘मोबाईल’चा उपवास करण्याची काळाची गरज आहे.