अहमदनगर दिनांक 28 जून
अहमदनगर महापालिका आयुक्त यांच्यावर लाचलुचपत विभागामार्फत झालेली कारवाई निष्पक्ष व्हावी व जातीय मानसिकतेतून असुरी आनंद साजरा
करणाऱ्या व्यक्तीवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी समस्त आंबेडकरी समाजाने पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन केली आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालय येथे उप पोलिस अधीक्षक अमोल भारती यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अजय साळवे, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, सुनील क्षेत्रे, राहुल कांबळे, रोहित आव्हाड, सिद्धार्थ आढाव, सिद्धार्थ भिंगारदिवे, सुजन भिंगारदिवे, कौशल गायकवाड, संजू जगताप, योगेश साठे, प्रतीक बारसे, संजय कांबळे, नितीन कसबेकर, भाऊसाहेब देठे, गौतमी भिंगारदिवे, शोभा गाडे, रमेश सानप, सतीश साळवे, वैभव जाधव, सागर ठोकळ,विशाल भिंगारदिवे, गणेश गायकवाड, अमोल गायकवाड, रवी साठे, सुशांत म्हस्के उपस्थित होते.
ज्या दिवशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी अहमदनगर मध्ये आले होते त्यावेळी दुपारीच अनेकांनी सोशल मीडियावर आयुक्त जावळे हेच आरोपी असल्याचे सांगत मेसेज व्हायरल केले. तसेच पत्रकार परिषद घेऊन आयुक्त जावळे हे भ्रष्टाचारी असल्याचे काही राजकीय नेत्यांनी सांगितले. अनेकांनी सोशल मीडियावर तोंड सुख घेतले तर महानगरपालिकेतील एक नुकताच बदली झालेला अधिकारी वारंवार फोन करून आयुक्त जावळे पकडले गेले का अशी माहिती घेत होता तर या अधिकाऱ्याच्या घरी या प्रकरणातील फिर्यादीचे आठ दिवस आधी पार्टी झाली होती अनेक वेळा मीटिंग झाली असा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला असून त्या अधिकारी आणि फिर्यादीचे मोबाईल कॉल तपासून पाहण्याची मागणी करण्यात आली त्यामुळे हा पूर्व नियोजित कट असून डॉक्टर पंकज जावळे यांना अडकवण्यात आले असल्याचा आरोप यावेळी सुरेश बनसोडे यांनी केला आहे.
आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली व ज्यात आयुक्त दोषी आहेत की नाही हा न्यायप्रविष्ठ विषय असून ही कारवाई निष्पक्ष व्हावी व जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी समस्त आंबेडकर समाजाच्यावतीने करण्यात आली. आयुक्त मागासवर्गीय बौद्ध समाजाचे असल्याने जाणीवपूर्वक जातीय मानसिकतेतून काही महाभागांनी शहरातील आंबेडकरी समाजाच्या भावना दुखतील असे कृत्य केले. ज्यात कोणी पालिकेच्या आवारात फटाके फोडले तर कोणी पेढे वाटले. काहींनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून आनंद व्यक्त केला. या सर्व प्रकाराने शहरातील आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या असून संबंधितांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.