अहमदनगर दि.२७ ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील मध्यवस्ती असणाऱ्या सबजेल रोड परिसरामध्ये गेल्या दीड-दोन वर्षांपासून दुर्गंधीयुक्त मैलामिश्रीत पाणी रस्त्यावर वाहत असून येथील रहिवासी अतिशय त्रस्त झाले आहेत.
संपुर्ण पावसाळ्यात येथील नागरिकांनी असाच त्रास सहन केला. दसरा-दिवाळी सुध्दा याच घाणीच्या साम्राज्यात साजरी केली. परिणामी पिण्याचे पाणी सुध्दा गाळ मिश्रित येत असून या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पाणी साचल्याने डास उत्पत्ती होत असून परिसरातील रहिवाशांना डेंग्यू – मलेरिया या सारखे आजार झाले आहेत.
या प्रश्नाबाबत या भागातील लोकप्रतिनिधींना अनेक वेळा नागरिकांनी लिखित तोंडी तक्रारी नोंदवूनही मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या लपंडावामध्ये सामान्य नागरिक मात्र भरडला जात आहे. या ठिकाणी पाणीही वाया जात असून घेणारे पाणी हे दुर्गंधीयुक्त येत असल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे मात्र एवढा मोठा गंभीर विषय असूनही महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे. एखाद्या निष्पाप नागरिकाचा मृत्यू होण्याची वाट महानगरपालिका प्रशासन पाहत आहे का? असा संतापजनक प्रश्नही या परिसरातील नागरिक आता विचारू लागले आहेत.
महानगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही हा प्रश्न सुटत नाही त्यामुळे महानगरपालिकेत जाऊन आंदोलन करून प्रश्न सुटत असतील तर आता या परिसरातील नागरिक महानगरपालिकेत जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. दुर्गंधीयुक्त पाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दलनात नेऊन टाकल्यानंतर त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य कळेल तेव्हाच प्रशासनाला जाग येईल का? त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा महानगरपालिकेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.