अहमदनगर दि.२९ ऑक्टोबर
शासनाने चायना मांजावर बंदी घातलेली असताना, सर्रास बाजारात चायना मांजाची विक्री होत आहे. या चायना मांजामुळे स्वत:च्या आणि इतरांच्या जिवावर संक्रांत येऊ शकते. दिवाळीची सुट्टी सुरू असून काही ठिकाणी या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पतंग उडताना दिसू लागले आहेत. अहमदनगर शहरात आणि महाराष्ट्रात संक्रांतीच्या सणाला पतंग उडवली जाते त्यामुळे दिवाळी संपली की संक्रांतीचे वेध लागतात आणि तेव्हापासूनच पतंग उडवण्यासाठी तयारी सुरू होते.
शासनाने नायलॉनच्या घातक चायना मांजावर बंदी घातली असली तरी, बाजारामध्ये सर्रास चायना मांजाचे बंडल सहजरीत्या उपलब्ध होत आहेत. या चायना मांजामुळे पक्षी तर जखमी होतातच, शिवाय लहान मुलांची बोटेसुद्धा कापली जातात. पतंग उडवताना, मांजा अनेकांच्या गळ्यात अडकल्यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. अनेक दुचाकीस्वारांचा गतीमुळे क्षणात गळा कापल्या जाऊ शकतो. मांजामुळे चेहऱ्यालासुद्धा इजा होऊन, त्वचा कापली जाते.
चायना माझ्या हा मनुष्य प्राण्यांसह पशु पक्षांना घातक असतानाही चायना मांजा पुन्हा एकदा विक्रीसाठी अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणावर आला आहे संक्रांतीच्या काळामध्ये महानगरपालिका आणि पोलीस चायना मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करतात त्यामुळे आता या विक्री करणाऱ्या दुकानदारांनी शक्कल लढवली असून दिवाळी आधीच मोठ्या प्रमाणात चायना मांजची ऑर्डर देऊन दिवाळीच्या सुट्टीत हा मांजा शहरात पोहोचला आहे. कारण जेणेकरून पुढील काळात हा मांजा विक्री करण्यासाठी अडचण होणार नाही म्हणून या मांजा विक्रेत्यांनी शक्कल लढवली आहे.
नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक गणेश कवडे यांनी सुद्धा या चायना मांजाच्या विषयाबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. कारण अमरधाम मध्ये मोठ्या प्रमाणात मोठमोठे झाडे असून या ठिकाणी पशुपक्ष या चायना मांज्याने जखमी होत असतात त्यामुळे या चायना मांज्यावर बंदी असतानाही विक्री होत असताना कठोर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक कवडे यांनी केली होती.
नॉयलॉन मांजामध्ये धातूच्या भुकटीचा वापर केला जात असल्याने, मांजाचा विद्युत तारांना स्पर्श झाल्यास त्यामुळे विजेचा धक्का बसू शकतो. पालकांनी मुलांना चायना मांजासह इतर कोणताही घातक मांजा घेऊन देऊन नये. त्यामुळे पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि आपल्या मुलांचा आणि इतरांचाही जीव वाचवावा.