अहमदनगर दि.१९ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील रस्त्यांची अवस्था फारच बिकट झाली असून शहरातील मध्यभागातील एकही रस्ता सध्या चालण्याजोगा राहिलेला नाही. या खड्ड्यांबाबत अनेक आंदोलने झाले तसेच अनेक संघटना राजकीय पक्षांनी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन याकडे लक्ष वेधले होते.मात्र अद्यापही शहर खड्ड्यातच आहे याच पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाच्या शुभारंभाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 19 नोव्हेंबर रोजी येणार असून त्यांच्या उपस्थितीत उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
नितीन गडकरी यांचा दौरा आल्यानंतर माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी नितीन गडकरी जाणार असून त्यानंतर अहमदनगर शहरातील भाजपचे शहराध्यक्ष भैय्या गंधे यांच्या निवासस्थानी नितीन गडकरी भेट देणार आहेत. त्यांचा हा दौरा आल्यानंतर नितीन गडकरी ज्या मार्गावरून जाणार आहेत त्या मार्गांचे भाग्य रात्रीतून उजळले असून अनेक ठिकाणी सध्या खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत.
महानगरपालिकेकडे अनेक वर्षांपासून नागरिक खड्डे बुजवण्याची मागणी करत असताना हे खड्डे रात्रीतून अचानकपणे बुजवले जाऊ लागल्याने असे वाटले होते की महानगरपालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर शहरातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.
मात्र माहिती घेतल्यानंतर हे काम फक्त नितीन गडकरी ज्या मार्गावरून जाणार आहेत त्या ठिकाणीच युद्ध पातळीवर रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याचे समजले आहे. त्यामुळे नितीन गडकरींसारखे कामदार मंत्री नगर शहरात रोजच वेगवेगळ्या ठिकाणी यावेत त्यामुळे तरी नगर शहराचे भाग्य उजळू शकते आणि खड्ड्यांपासून नागरिकांना मुक्ती मिळू शकते अशी मिश्किल टिपणी आता नागरिकांमधून होत आहे.कारण जर केंद्रीय मंत्री शहरात आल्यानंतर रात्रीतुन रस्त्यांचा कायापालट होत असेल तर असे मंत्री रोजच नगर शहरात येवो अशी अपेक्षा नगरकर करू लागले आहेत.