अहमदनगर दि.२१ ऑक्टोबर :
आसमंत उजळून टाकणाऱ्या दिवाळीत यंदा आतषबाजीलाही जोर येणार आहे. कारण दोन वर्षांच्या खंडानंतर फटाक्यांच्या खरेदी-विक्रीलाही प्रतिसाद चांगला मिळत आहे. यावर्षी फटाक्यांच्या किमतीत ४० ते ६० टक्क्यांची वाढ झाली आहे.
सावेडी उपनगर मधील गंगा उद्यान मागील उपनगर फटाका असोसिएशनच्या वतीने या वर्षी 14 स्टॉलची उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी सुरसुरी, भुईचक्र, पाऊस, आपटी बॉम्ब, रॉकेट या पारंपरिक फटाक्यांसह बाजारात अनेक नवे फटाके आले आहेत. आकाशात उडणाऱ्या ‘शॉट्स फटाक्या’त विविध प्रकार आल्याचे याठिकाणी फटाक्यांचा व्यापार करणारे महेश घावटे आणि रणवीर शितोळे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, दरवर्षी बाजारात नवनवे प्रकारचे फटाके येत असतात. यंदा आकाशात उडणाऱ्या फटाक्यांमध्ये नवनवे प्रकार आले आहेत. उंच आकाशात दीर्घकाळ प्रकाशमान राहणारे फटाके यंदाचे आकर्षण आहेत. लांबून हे फटाके दृष्टीस पडतील. तसंच, आवाज न करणारे, फक्त प्रकाशित होणारेही फटाके बाजारात आले आहेत. बंदुकीच्या आकारात असलेल्या फटाक्याच्या वातीला जाळल्यास त्यातून रंगीत प्रकाश बाहेर पडतो. हा प्रकारसुद्धा लहान मुलांच्या पसंतीस पडत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बेरियम नायट्रेटच्या वापरावर निर्बंध घातल्याने उत्पादन ४० टक्क्यांनी घटले आहे. तर, फटाके बनवण्यासाठी बेरियम नायट्रेटबरोबरच अमोनियम नायट्रेट, अॅल्युमिनियम पावडर, कॉपर कोटेड वायर, सल्फर, रद्दी पेपर, सुतळी अशा कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. परिणामी फटाक्यांच्या किमती ४० ते ६० टक्क्यांनी महागल्या आहेत. कामगारांची मजुरी, इंधन दरात वाढ यांचीही भर त्यात पडली आहे.
देशभरातील ९० टक्के फटाक्यांचे उत्पादन तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीत होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांनंतर येथील उत्पादन घटले आहे. त्यामुळे मजुरांची संख्याही कमी झाली आहे. येथील ६.५ लाख कुटुंबाचा उदरनिर्वाह येथील फटाक्यांवर अवलंबून आहे. मात्र, बेरिअमवरील निर्बंधामुळे दीड लाखांहून अधिक लोक बेरोजगार झाले आहेत.
“दिवाळी हा सण संपूर्ण भारतामध्ये साजरा होत असतो दिवाळी सणाला कोणताही धर्म आडवा येत नाही. त्यामुळे सर्व धर्मातील नागरिक हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात संपूर्ण जगाचे लक्ष भारतामधील दिवाळीच्या मार्केटमध्ये होणाऱ्या आर्थिक उलाढालीकडे असते. आणि त्यानंतर संपूर्ण जगामध्ये ख्रिसमस सण साजरा होतो मात्र भारतात सध्या फटाके बंदी आणि प्रदूषण बंदीच्या नावाखाली फटाकडे वाजवणाऱ्यावर निर्बंध आणले जात आहेत. तर संपूर्ण युरोप खंडामध्ये ख्रिसमसच्या काळात रात्रभर फटाक्यांची आतिषबाजी होत असते त्यामुळे मोठ्या आवाजाच्या फटाकड्यांवर आणि प्रदूषण करणाऱ्या फटाकड्यावर बंदी असावी मात्र ज्यापासून निसर्गाला धोका होणार नाही अशा फटाकांसाठी बंदी घालणे चुकीचे आहे असे मत महेश घावटे यांनी व्यक्त केले आहे.”
दोन वर्षांच्या लॉकडाऊननंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. निर्बंधमुक्त दिवाळीमध्ये महागाईच्या झळा लागत असल्या तरीही फटाक्यांची खरेदी जोरात सुरू आहे. उपनगर फटाके असोसिएशनच्या वतीने उभा केलेल्या स्टॉल परिसरात ग्राहकांना पार्किंग साठी भव्य दिव्य व्यवस्था करण्यात आली असून गर्दी पासून दूर आणि अत्यंत सुटसुटीत पद्धतीने आपण या ठिकाणी फटाकडे खरेदीचा आनंद लुटू शकता यावर्षी पावसाने नगर शहरावर चांगलीच कृपा केली असली तरी या मैदानावर चिखल नसल्याने या ठिकाणी नागरिकांना खरेदी करणे सोयीस्कर होत आहे.