अहिल्यानगर, ता. ९ ः
पत्रकारावर हल्ला होणे ही गंभीर बाब आहे. अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. हल्लेखोर कुणीही असो तो पोलिसांच्या हातून सूटणार नाही. कोतवाली पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखाही या प्रकरणाचा तपास करत आहे. लवकरच हल्लेखोराला अटक होईल, असे प्रकार पुन्हा होणार नाहीत, यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अहिल्यानगर पत्रकार संघाला आज दिली.
‘सकाळ’चे बातमीदार अरुण नवथर यांच्यावर शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा पत्रकारांसह वकिल, सामाजिक संघटना निषेध केला आहे. आज अहिल्यानगर पत्रकार संघाच्या वतीने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी घार्गे यांनी तत्काळ दखल घेत यंत्रणा कामाला लावली आहे.
या प्रकरणाचा तपास करून हल्लेखोराला तत्काळ अटक करावी, तसेच परिसरातील नशेखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अहिल्यानगर पत्रकार संघाने आज पोलिस अधीक्षक घार्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. केडगाव, तसेच उपनगरांमधील सार्वजनिक वास्तू नशेखोरांचे अड्डे बनले असून, त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही बाब पत्रकारांनी आज पोलिस अधीक्षक घार्गे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल लगड, सचिव संदीप रोडे, खजिनदार सुनील चोभे, उपाध्यक्ष सुशील थोरात, सहसचिव दौलत झावरे, कार्यकारिणी सदस्य अन्सार सय्यद, संदीप जाधव, अलताफ कडकाले, बाळासाहेब धस, डॉ. सुर्यकांत वरकड, सचिन दसपुते, माजी अध्यक्ष शिवाजी शिर्के, सुहास देशपांडे, नितिन पोटलाशेरू, अशोक झोटिंग, श्रीराम जोशी, मिलिंद देखणे, राम नळकांडे, अशोक निंबाळकर, देवीदास आंधळे, दीपक मेढे, गोरक्षनाथ शेजूळ, समीर दाणी, आदील शेख, सुर्यकांंत नेटके, मयूर मेहता, नवनाथ खराडे, ज्ञानदेव शेलार, गोरक्षनाथ बांदल, दीपक कांबळे, गणेश देलमाडे, बाबा ढाकणे, शिवामृत सालगरे, समर्थ गोसावी, सुधाकर जाधव, मकरंद बिडवाई, अक्षय आरकल, विलास राजगुरू आदी उपस्थित होते.
—
प्रहार संघटनेकडून निषेध
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार काम करतात. परंतु या चौथ्या स्तंभावर अशा प्रकारे हल्ले होत असतील तर ही बाब निंदनीय आहे. गुन्हेगार हल्ला करून पसार झाला आहे. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी प्रहार संघटनेने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मणराव पोकळे, संदीप शेंडकर आदी उपस्थित होते.
—
हल्लोखोराला अटक करा
पत्रकारावर हल्ला होणे हा गंभीर प्रकार आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीला तत्काळ अटक करावी, अशी मागणी अहिल्यानगर बार असोसिएशनने पोलिस अधीक्षक घार्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्ररणी तपास करून लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपत्र दाखल करावे, अशी मागणी यावेळी ॲड. राजेश कातोरे, ॲड. वैभव आघाव, ॲड. संदीप बुरके, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. मनीषा केळकंद्रे, ॲड. जया पाटोळे आदींनी केली आहे.