अहमदनगर दि.१७ ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरमधील प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये महानगरपालिकेच्या मालकीचे भव्य दिव्य असे व्यापारी संकुल आहे. मात्र हे व्यापारी संकुल आता पडण्याच्या परिस्थितीत आले असून या ठिकाणी अनेक मूळ गाळधारकांनी गाळे विकले असून या ठिकाणी भाडेकरू आणि पोट भाडेकरू सध्या व्यवसाय करत आहेत.
हे जुने व्यापारी संकुल पाडून त्या ठिकाणी नवीन व्यापारी संकुल बांधण्यासाठी महानगरपालिकेने आराखडा केला होता मात्र या ठिकाणी असलेल्या गाळे धारकांनी हे व्यापारी संकुल पाडण्यास विरोध केला आणि याबाबत अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या 15 ऑक्टोबर रोजी गाळेधारकांनी दाखल केलेल्या 48 याचिकांपैकी 35 याचिका अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
तर उरलेल्या आठ प्रकरणांची सूनवणी आजपासून सुरू झाली न्यायालयाने सर्व आठ प्रकार एक वेळी न घेता एक एक प्रकरण सुनावणीसाठी घेण्याचे आदेश दिले आहेत. महानगरपालिकेच्या वतीने ऍड. प्रसन्न जोशी यांनी आज बाजू मांडताना ज्या गाळेधारकांनी गाळे पाडू नयेत म्हणून याचिका दाखल केली त्यापैकी अनेक गाळेधारक पोट भाडेकरू असून मूळ मालक वेगळेच आहेत हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच ज्या कारणांसाठी या ठिकाणी महानगरपालिकेबरोबर करार करून व्यवसायासाठी गाळे दिले होते त्याचा भंग करण्यात आला असल्यासही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. या प्रकरणाची पुढील सूनवणी आता 5नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसंच महानगरपालिकेच्या वतीने ऍड.प्रसन्ना जोशी यांनी याबाबत कोर्ट कमिशन नेमून प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून अहवाल मागवला तर संपूर्ण खरी वस्तुस्थिती समोर येईल असेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
तर आज या गाळ्यांमधील एका दुकानाचा पंचनामा महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला आहे त्याचा अहवाल न्यायालयासमोर ठेवण्यात येणार आहे.गाळे पडावे अथवा पाडू नये यासाठी कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे योग्य तो निर्णय घेण्यास महापालिकेला मोकळीक आहे, अशी माहिती महापालिकेचे वकील ऍड. प्रसन्ना जोशी (Adv Prasannakumar Joshi) यांनी दिली.