अहिल्यानगर दिनांक 27 मे
राज्यात अनेक तलाठ्यांनी आपल्या हाताखाली शासकीय कामकाज करण्यासाठी खासगी व्यक्तींची परस्पर नियुक्ती केल्या असल्याची तक्रार राज्य लाचलुचपत विभागाच्यावतीने शासनाकडे करण्यात आली होती. महसूल विभागाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर कक्ष अधिकार्यांच्यावतीने अखेर अशा प्रकारचे वर्तन करणार्या तलाठ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.राज्याच्या अपर महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांनी सापळा पडताळणी कारवाई दरम्यान तलाठी हे त्यांचे शासकीय कामकाज एखाद्या खासगी कार्यालयातून करतात.तसेच त्यांची शासकीय कामे करण्यासाठी अनधिकृतपणे खासगी व्यक्तींची नियुक्ती केली आहे. अशा व्यक्तीकडून शासकीय कामे करवून घेतली जातात. तसेच खासगी कार्यालयात शासकीय दस्तावेज ठेवतात. ही बाब कारवाईसाठी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यानुषंगाने कक्ष अधिकारी यांनी आदेश दिले आहे की, महाराष्ट्र जमीन महसूल संहितामधील तरतुदीनुसार ग्राम महसूल अधिकारी, तलाठी यांची कर्तव्ये व जबाबदार्या नमूद केलेल्या आहेत. सदर कर्तव्य व जबाबदार्या पार पाडताना ग्राम महसूल अधिकारी यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 अन्वये प्रत्येक शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनी त्यांचे कर्तव्य पालन करताना, वर्तणूकविषयक नियम विहित करण्यात आलेले आहेत. सदर नियमांचे पालन प्रत्येक शासकीय कर्मचारी,अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे.
शासकीय कामकाज करण्यासाठी खासगी व्यक्ती, मदतनीस नेमण्याबाबत शासन स्तरावरून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.तलाठी हे शासकीय कामकाज करण्यासाठी खासगी व्यक्ती नेमत असतील तर संबंधित तलाठी यांच्याविरूद्ध शासनाच्या सध्याच्या नियमांतर्गत तात्काळ उचित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या आदेशाला अहिल्यानगर जिल्ह्यासह नगर शहरात आणि नगर तालुक्यात असलेल्या काही तलाठ्यांनी तिलांजली दिली आहे अजूनही तलाठी कार्यालयात खाजगी इसम तलाठी कार्यालयात काम करत असल्याचं दिसून येत आहे.
याबाबत नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते देवकर भाऊसाहेब अहिलाजी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन नगर शहरातील सावेडी, नागापूर,नवनागापुर या तलाठी कार्यालया मध्ये खाजगी इसम पाहत असून या खाजगी इसमांकडून सर्वसामान्य नागरिकांकडून छोट्या मोठ्या कामांसाठी अव्वच्या सव्वा पैसे वसूल करत असल्याची तक्रार केली आहे. जे नागरिक पैसे देत नाहित त्यांचे काम करण्यास विलंब केला जातो या बाबत तलाठी कार्यालयातील अधिकाऱ्यांना सांगूनही ते या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा खासगी इसमांवर कारवाई व्हावी अशी मागणी देवकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.