नगर – महाराष्ट्र विधानमंडळ संसदीय ऑनलाईन प्रणालित बदल करून जिल्ह्याचे व शहराचे नाव अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर करावे. या बदलासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन अहिल्यानगरचे आ.संग्राम जगताप, आ.विठ्ठल लंघे व आ.अमोल खताळ या महायुतीच्या आमदारांनी विधानमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंगळवारी विधानभवनात दिले.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मंगळवारी आ.जगताप, आ.लंघे व आ.खताळ यांनी सभापती राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही महिन्यापूर्वी अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करण्यात आले आहे. त्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिल्यानंतर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र शासनाने राजपत्रित अधिसूचना प्रसिद्ध करून अधिकृतरीत्या शहर व जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ असे निश्चित केले आहे.
मात्र, अद्याप महाराष्ट्र विधानमंडळाच्या संसदीय ऑनलाईन प्रणालीत शहराचे व जिल्ह्याचे नाव अहमदनगर असेच दर्शवले जात आहे. शासनाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, हे नामांतर झाले असल्याने आपल्या कामकाजात अहिल्यानगर असे अद्ययावत करणे आवश्यक आहे. तरी या बाबत तातडीने संबधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत.
———————————————–