Home शहर आयुक्त साहेब गोर गरीबांचे अतिक्रमण दिसले धनाड्यांचा नंबर कधी ? अतिक्रमण मोहीम...

आयुक्त साहेब गोर गरीबांचे अतिक्रमण दिसले धनाड्यांचा नंबर कधी ? अतिक्रमण मोहीम फक्त कापडबजार आणि पाईपलाईन रोड वरील ठरावीक भागातच का ?

अहमदनगर दि .१९ मार्च
अहमदनगर शहरातील कापड बाजारांमध्ये व्यापारी आणि फेरीवाली यांच्या मध्ये वाद झाला होता. हा वाद झाल्या नंतर व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत बाजार बंद ठेऊन वाद करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उठणार नाही ही भूमिका घेतली होती त्यानंतर हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये जाऊन फेरीवाल्या वर गुन्हा दाखल करण्यात आला होता शहर शिवसेनेने व्यापाऱ्यांच्या बाजूने उतरत कापड बाजार मधील अतिक्रमण दूर करावे ही मागणी केली होती. त्या प्रकरणानंतर दोन दिवसांनी महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कापड बाजारातील रोडवर असलेली अतिक्रमण काढण्याची कारवाई केली. याच प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेरीवाल्यांना कायमस्वरूपी कापड बाजारातून बाहेर काढावे अशी मागणी केली होती.

त्यामुळे सध्या मुख्य बाजारपेठेतील रस्ते मोठे दिसत असले तरी या रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटाचा प्रश्न मात्र आता उभा राहिलेला आहे गरीब फेरीवाल्यांच्या पोटावर दोन मिनिटात लाथ बसते मात्र वर्षानुवर्षे मोठ्या इमारती उभा करून महानगरपालिकेला फसवून ज्या धनदांडग्या लोकांनी अतिक्रमण करून इमारती उभ्या केल्या आहेत त्यांच्यावर कारवाई न करता फक्त नोटीस दिली जाते. कापड बाजारामध्ये काही इमारती नव्याने झाल्या आहेत मात्र या उंच इमारतींना पार्किंग नाही किंवा मोठी आग लागल्यानंतर बाहेर पडण्याचा मार्ग नाही अशी अवस्था अनेक इमारतींमध्ये आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही तर कोर्टाच्या आदेशा नंतरही काही नामांकीत दावाखान्यांची पार्किंग गायब आहेत त्यावर कारवाई होत नाही हे विशेष.

कापड बाजार प्रमाणेच पाईपलाईन रोडवरील यशोदानगर समोर असलेल्या तीस पत्रा मार्केट दुकानांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने हातोडा टाकला विशेष म्हणजे या तीस दुकानांच्या बाजूला असलेली इतर अतिक्रमणे या पथकाला दिसली नाही हे विशेष फक्त तीस दुकाने काढण्यामागे काय उद्देश होता हेही समजायला तयार नाही. गुलमोहर रोड ,पाईपलाईन रोड ,तपोवन रोड बालिकाश्रम रोड, तारकपूर रोड,कापडबजार ,दिल्लीगेट परिसर, चितळे रोड या ठिकाणी अनेक पक्की अतिक्रमणे झालेली आहेत महानगरपालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम करताना दिलेल्या नकाशाप्रमाणे एकही काम आढळून येत नाही मात्र ही अतिक्रमणे महापालिकेला दिसत नाही का ? असा सवाल गोरगरीब कष्टकरी फेरीवाले करत आहेत.

आज कापड बाजारामधील फेरीवाल्यांच्या बाजूने अनेक संघटना उतरल्या या संघटना राजकीय संबंधित असतात मात्र कोणत्याही संघटनेने पाठपुरावा करून या फेरीवाल्यांसाठी महानगरपालिकेच्या वतीने एखादे मोकळी जागा करून घेण्यासाठी प्रयत्न केले नाही किंवा जागा या फेरीवाल्यांसाठी दिल्या होत्या तेथे या फेरीवाल्यांना बसवण्यासाठी प्रयत्न केले गेले नाही. फेरीवाल्यांचा उपयोग फक्त अतिक्रमण मोहीम चालू असतानाच राजकीय ताकद दाखवण्यासाठी होतो का ? हा ही प्रश्न आता समोर येतोय फेरीवाल्यांचा प्रश्न खरंच सोडवायचा असेल तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन शहरातील महानगरपालिकेच्या मालकीची एखादी मोकळी जागा या फेरीवाल्यांना कायमस्वरूपी देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे अन्यथा या फेरीवाल्यांचा फुटबॉल झाल्याशिवाय राहणार नाही.

आज्या फेरीवाल्यांना कापड बाजारातून हटवल्या मुळे एका फेरीवाल्या नव्हे तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांबाबत महानगरपालिकेने आणि राजकीय पक्ष संघटनांनी गांभीर्यपूर्वक विचार करून त्यांना न्याय मिळेल असे काम करणे गरजेचे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version