अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाची केवळ दिखाऊ मोहीम सुरू असून प्रत्यक्षात शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दररोज घरासमोर येणारी घंटागाडी ८ ते १० दिवस गायब राहते, त्यामुळे नागरिकांना घरातील कचरा साठवून ठेवावा लागतो किंवा नाईलाजाने रस्त्यावर टाकावा लागतो. परिणामी शहरभर दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
उपनगर मधील प्रत्येक कॉलनीच्या प्रवेश दरावरच कचरा साठलेला दिसून येतो तर स्वच्छता करणारे झाडु कामगार शोधून सापडत नाही.अशी परिस्थिती सध्या नगरकरांची आहे.शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका महापालिकेने २ वर्षांपूर्वी दिला असला तरी प्रत्यक्षात ठरलेल्या अटींप्रमाणे काम होत नाही. घनकचरा संकलनात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात संगनमताने भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे
शहरातील कचरा उचलला जात नसतानाही केवळ कागदोपत्री वजन दाखवले जात आहे, असा दावा काही माजी नगरसेवकांनी केला आहे. या अस्वच्छतेमुळे शहरात साथीचे आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे. महानगरपालिकेने नागरिकांकडून दरवर्षी घेणाऱ्या कर रुपी पैशाची भरमसाड वाढ केली आहे मात्र नगरकरांना त्या प्रमाणात सेवा उपलब्ध करून देण्यात अहिल्यानगर महानगरपालिका अपयशी ठरत आहे त्यामुळे नगरकरांनी कर का भरावा असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.