अहिल्यानगर : सार्वजनिक उत्सव मिरवणुकांमध्ये जल्लोष करण्यासाठी डीजे ध्वनीक्षेपकांऐवजी ब्लूटूथ हेडफोन, वायरलेस एअर बडस् असे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पर्सनल ऑडिओ डिवाइस वापरण्यात यावेत, या नाविन्यपूर्ण व शांततापूर्ण उत्सव संकल्पनेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी हरिभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय ललवाणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात श्री ललवाणी यांनी म्हटले आहे की,
आपले महाराष्ट्र राज्य हे सण, उत्सव व धार्मिक परंपरा असलेले राज्य आहे. विविध सार्वजनिक उत्सव व सणानिमित्त नागरिक मोठ्या उत्साहाने एकत्र येतात. मात्र अलीकडील काळात सार्वजनिक उत्सव मिरवणुकांमध्ये कार्यकर्ते जल्लोष करण्यासाठी मोठ्या कर्कश्य व असह्य आवाजाचे डीजे डॉल्बी ध्वनिक्षेपक वापरतात. या कर्कश आवाजातून सहभागी कार्यकर्त्यांना आनंद व उत्साह मिळत असला तरी नजीकच्या ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण व इतर नागरिकांना या कर्कश ध्वनी प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. असह्य आवाजामुळे अनेकदा जीवित हानी झालेली आहे.
या सर्व बाबींचा विचार करता ब्लूटूथ हेडफोन वायरलेस – इयर बडस् व पर्सनल ऑडिओ डिवाइस हा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शांततापूर्ण उत्सव साजरा करण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे.





