अहिल्यानगर दिनांक 15 जून
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी वेळोवेळी आपल्या भाषणातून आपल्या पराभवाचे विश्लेषण केले आहे आणि आगामी काळात हिशोब चुकता करण्याचा इशारा त्यांनी वेळोवेळी दिला आहे.
“श्रीगोंद्यामुळे माझा पराभव झाला हे सत्य आहे, पण मी जनतेवर नाराज नाही. मात्र, तालुक्यातील काही नेत्यांवर विश्वास ठेवल्याने आणि त्यांच्याशी जवळीक ठेवल्याने माझे वाटोळे झाले.” ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांची यादी मनात असून, आगामी निवडणुकीत हिशोब चुकता करू, असा इशाराही त्यांनी दिला होता.
२०२३ वर्षांच्या मध्यात राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. या निवडणुकीने नगर जिल्ह्यातील राजकारणाचा नवा पायंडा तयार केला. विखे विरुद्ध सर्व असा सामना त्यात पहायला मिळाला. गणेश कारखाना निवडणुकीच्या विजयानंतर विखे गटाच्या विरोधात सर्वच पक्षांनी एकत्र येण्यास सुरूवात झाली. कधी नव्हे ते थोरात-कोल्हे-लंके-शिंदे हे सर्वच निवडणूक व मोठ्या कार्यक्रमांत एकत्रित दिसू लागले. यातून लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांना पाठबळ देण्यास सुरूवात झाली. तर भाजपचे आमदार राम शिंदे हे उघडपणे निलेश लंके यांच्या समवेत दिसले होते. अहिल्यानगर शहरातही 2019 च्या निवडणुकीत स्वर्गीय अनिल राठोड यांनी युती असताना विखे यांचा प्रचार केला होता मात्र त्यांना कालांतराने विश्वासात न घेता राष्ट्रवादीशी जवळीक साधली असा आरोप झाला होता त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील मोटार मोजतील इतके नगरसेवक उगवता सर्वच नगरसेवकांनी सुजय विखे पाटील यांच्या विरोधात मोट बांधली होती. महाविकास आघाडी असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील सर्वच नगरसेवक एकत्रित होऊन त्यांना साथ भाजप मधील काही माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे नगर शहरातील विखे विरोधी ताकद मोठी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना सुजय विखे पाटील यांनी जवळ केल्याचा आरोप करत भाजप मधील अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक विखे यांच्या विरोधात काम करत होते.
निवडणुकीच्या काळात आणि मतदानाच्या दिवशी हे प्रामुख्याने दिसून आले महायुती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते खासदार विखेंच्या भूत सांभाळत होते तर अनेक भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी शांतच होते.लोकसभा निवडणुकीत भाजपचे काही नेते ऐनवेळी प्रचारापासून दूर राहिले. ज्यांच्यावर खूपच विश्वास ठेवला त्यांनीही लंकेंना मदत केल्याने डॉ. सुजय विखे पाटलांचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया देताना विरोधी व्यासपीठावरील अनेकांनी आपल्याला मदत केल्याचं जाहीर केलं होतं. लोकसभा निवडणुकीत भाजप मधील काही जणांनी त्यांचेच उमेदवार पाडण्यात रस दाखविल्याची चर्चा अजूनही झडत आहे.
आता महानगरपालिकेचे निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून आता माजी खासदार सुजय विखे पाटील हे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये सुजय विखे पाटील यांनी पारनेर, आणि मुख्यतः संगमनेर विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या पराभवाचा पराभवाचा बदला घेतल्याचे दिसून आले आहे.
आता नगर शहर मतदारसंघात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हातात बुद्धिबळाचा डाव येणार आहे. मध्यंतरीच्या घडामोडींमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जवळपास सर्वच नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. तर काँग्रेस आणि शरद पवार गटातील अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता लोकसभेच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी विखे पुन्हा एकदा बुद्धिबळातील डाव खेळून एक एक प्यादे नामोहरण करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगर शहरात विखे यांना 2019 पेक्षा 2024 च्या निवडणुकीत कमी मतदान झाले होते आणि याला कारणीभूत असलेले नगरसेवक पुन्हा महायुती मध्ये आल्यामुळे विखेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
स्व पक्षातील असो अथवा विरोधी पक्षातील सर्वांचाच बदला घेतला जाईल असे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी वेळोवेळी बोलून दाखवले होते. त्यामुळे आता विधानसभेनंतर नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये विखे पॅटर्न काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र ज्यांनी ज्यांनी विरोधात काम केले ते मात्र धास्तीत असून पुन्हा एकदा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याशी सूर जुळण्याची धडपड काहीजण करत आहेत.