करमाळा दि ८ फेब्रुवारी
महराष्ट्रात पतीच्या निधनानंतर अंत्यविधीच्या वेळी, मृताच्या पत्नीच्या सौभाग्याचे लेणे असलेले तिच्या कपाळावरील कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे ही प्रथा आजही आस्तित्वत आहे. पतीला अग्नी दिला जात असताना, स्त्रीची सौभाग्याची ही आभुसने काढून घेतली जात असताना, त्या स्त्रीच्या मनाला किती वेदना होत असतील याचा आपण विचार करावा. असा प्रसंग, कोणत्याही महिलेवर येणे ही तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी घटना असते.
पतीच्या निधनानंतर विधवा महिला, विद्रूप दिसावी तिच्या कडे कोणी वाईट नजरेने पाहू नये, असा कदाचित त्याकाळी या प्रथेमागे हेतू असावा. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. महिला मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित झाल्या आहेत, अंधश्रध्दा कमी होवून समाज विज्ञानवादी होत आहे, त्यामुळे अशा अनिष्ट प्रथा बदलल्या पाहिजेत असं आवाहन करमाळा येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे जेष्ठ पदाधिकारी प्रमोद झिंजाडे यांनी केलं आहे.
असे काही करण्याने, समाज अशा महिलांकडे वाईट नजरेने पहात नाही असे म्हणता येणार नाही. विधवा महिलांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात अशा गोष्टींमुळे खूप त्रास सहन करावा लागतो. अशा महिलांना साध्या हळदी कुंकवाच्या, देवधर्माच्या वा कोणत्याही शुभ कार्यात बोलावले जात नाही, उलट त्यांना अशा कार्यक्रमात डावललेच जाते. महिला विधवा झाली म्हणून तिला समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाद केले जाते, हे अन्यायकारक आहे. अशा प्रथा थोड्याफार फरकाने इतर राज्यातही असतील. मात्र, अशी ही अनिष्ट प्रथा, पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही.
त्यामुळे ही प्रथा बंद करण्यासाठी पुरोगामी विचाराच्या सर्व महिला पुरुषांनी चळवळ उभी करून, या प्रथेविरुध्द समाज प्रबोधन करण्याची व शासनास ही प्रथा बंद करण्यासाठी कायदा करण्यास लावण्याची गरज आहे.
अशा प्रथांमुळे महाराष्ट्राच्या एकूण जनतेपैकी अर्धी जनता बाधित होत आहे हे विचारात घेतले पाहिजे. त्यामुळे या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व महिला, पुरुष, प्राध्यापक, शिक्षक, वकील, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त न्यायमूर्ती , सामाजिक संस्था, संघटना तसेच ज्यांना ज्यांना ही प्रथा अनिष्ट व अन्यायकारक वाटते, अशा सर्वांनी या कामात पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीतजास्त समविचारी महिला व पुरुषांनी ही प्रथा बंद व्हावी याबाबत गांभीर्याने विचार करावा असे आवाहनही प्रमोद झिंजाडे यांनी केलं आहे.