अहमदनगर दि.२७ नोव्हेंबर
गरिबांना चांगले जीवन जगता यावे यासाठी शासनाकडून धान्य वाटप केले जाते. मात्र या धान्य वितरणातही हेराफेरी केली जात असल्याने गरीब सर्वसामान्य जनतेचे ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, आता शासनाकडून मिळणारे धान्य हाच त्यांचा एकमेव आधार आहे. अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे शेतकरी दारिद्र्यरेषेखाली येतात आणि त्यांना अन्नासंबंधी समस्या भेडसावत आहेत.
मागील दोन महिन्यांत अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात रेशन माफियांवर छापा टाकून महसूल विभागाने रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री साठी येत असताना पकडले होते. तर दोन दिवसांपूर्वी अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड येथील ताराचंद बोथरा यांच्या दुकानातून 160 तांदळाच्या गोण्या जप्त करण्यात आल्या. हा सर्व रेशनचा माल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी दीपक बोथरा यांच्यासह एकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दीपक बोथरा हा या रेशन माफियांच्या साखळीतील एक कडी असून पोलिसांनी संपूर्ण साखळी शोधून काढावी अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
अहमदनगर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रेशनचा काळाबाजार सुरू आहे मात्र काही काही वेळाच एवढी मोठी कारवाई होत असते. विशेष म्हणजे नगर शहरात पुरवठा विभाग नेमकं करतो काय असा प्रश्न समोर येतोय मार्केटची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखा आणि कोतवाली पोलिसांनी केली आहे. मात्र पुरवठा विभाग झोपला होता की झोपेचे सोंग घेतो. अनेक वेळा राजरोस गरिबांच्या धान्यावर डल्ला मारला जातो मात्र त्यांच्या तक्रारीची पाहिजे तेवढी दखल घेतली जात नाही.त्यामुळे कंटाळून तेही तक्रार करणे सोडून देतात जेवढे भेटेल तेवढे पदरी पाडून घेऊन शांत बसणे हाच मार्ग त्यांच्यासमोर राहतो त्यामुळेच रेशन माफियांचे फावले जाते.
दोन दिवसांपूर्वी मार्केटयार्ड प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. यात धान्य माफिया दीपकचा समावेश आहे. मात्र, केवळ एवढ्या कारवाईवर न थांबता प्रशासन जिल्ह्यातील रेशन माफियाचे हे साम्राज्य मोडीत काढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात शासकीय धान्याचा काळा बाजार करणारे रॅकेट कार्यरत आहे. थेट अकोल्या पासून खर्ड्या पर्यंत धान्य गोळा करणारी विंग आहे. दुसरीकडे रेशन दुकानदारांच्या गोदामातून धान्याची उचल करणारी स्वतंत्र यंत्रणा माफियांनी उभारली आहे. यासाठी वाहनांचा ताफाही या माफियांकडे असतो. पंटरकडून जमा केलेल्या या धान्यावर घातक रसायनांचा प्रयोग करून त्याला चांगल्या प्रतीच्या धान्यात भेसळ करण्यासाठी वापरले जाते. यातून मोठी आर्थिक रसद रेशन माफियाला मिळत आहे. वर्षानुवर्षे ठराविक शासकीय लोकांना हाताशी धरून हा कारभार चालविला जात आहे. मार्केट यार्डात ज्या धान्य माफियावर कारवाई करीत तांदूळ जप्त करण्यात आला आहे, त्याच मार्केट यार्ड मध्ये या आधी काही वर्षांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने रेशनचा मोठा साठा पकडला होता.
पोलिसांनी आता या प्रकरणाचा सखोल तपास करून यामध्ये कोण कोण सामील आहे. रेशनचे हे अन्न बाहेर येतेच कसे यामध्ये कोणाकोणाला किती मलिदा मिळतो याची तपासणी केल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात. गरिबांच्या ताटातील धान्य बाजारात विक्री करणारा या माफियांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. मात्र त्गोरगरिबांची दुवा घ्यायची असल्यास अशा रेशन माफियांवर कडक कारवाई करून त्यांची पाळमुळे खोदून काढून पांढऱ्या कपड्याखाली वावरणाऱ्या काळ्या लोकांचा पडदा फाश करणे गरजेचे आहे. पोलिसांना ही संधी चालून आली आहे त्यामुळे आता पोलिसांनी या संधीचा फायदा घेत रेशन माफियांचे पाळेमुळे खोदून काढून व्हाईट कॉलर गुन्हेगारांना समोर आणावे हीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे.
अन्नधान्यासाठी हैराण झालेल्य सामान्य जनतेला राज्यशासन पुरवठा विभाग यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. धान्य हा आपला हक्क आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे आणि जे ते देत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.