अहिल्यानगर दिनांक 18 जून
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नूतन पोलीस अधीक्षक म्हणून सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीला अनेक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्यांमध्ये पारदर्शकता असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक वेळा बदल्यांमुळे आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र यावेळी प्रत्येकाला आपल्या इच्छुक ठिकाणी बदली मिळाल्यामुळे कर्मचारी वर्गांमध्ये खुशीचे वातावरण आहे.
पोलीस कर्मचाऱ्यानंतर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्याही अनेक ठिकाणी आदलाबदली करण्यात आली आहे. काही पोलीस निरीक्षक बदली होऊन जिल्ह्याबाहेर गेले आहेत तर काही पोलीस निरीक्षक पर जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात बदली होऊन आलेले आहेत.
आता वेध लागले आहेत ते स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी कोणाला मिळणार या कडे 4 एप्रिल 2023 रोजी अहिल्यानगर गुन्हे शाखेचा पदभार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्वीकारला होता. त्यानंतर गेल्या दोन वर्षात अनेक मोठे गुन्हे खून, दरोडे , सायबर गुन्हे,असे कारवाया स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून उघडकीस आल्या आहेत. मागील दोन वर्षात स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी अति उत्तम अशीच म्हणता येईल. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असून सध्या या जागेवर नियुक्ती मिळावी म्हणून काही पोलीस निरीक्षक प्रयत्न करत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कार्यभार घेतल्या पासून त्यांनी जिल्ह्यातील गो तस्कर, आणि अवैद्य धंदा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कडक पाऊल उचलण्यास सुरू केले आहे. नगर शहरात झालेली पत्त्याची रेड म्हणजे पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अवैद्य धंदे मुळासकट बंद करण्याची एक प्रकारे सूचना दिल्यासारखी म्हणता येईल कारण स्थानिक पोलिसांना न कळवता विशेष पथक स्थापन करून अचानकपणे प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना पाठवून पत्त्याच्या क्लबवर हा छापा टाकण्यात आला होता. या छाप्यानंतर पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर यांचा बदली कार्यकाळ पूर्ण झाला असल्याचे समजून त्यांची बदली होणार, हे गृहीत धरूनच या पदासाठी काहींनी राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजविणे सुरू केल्याच्या खमंग चर्चा झडत आहेत.
अनेक जण आपली पोलिस दलातील ‘दैदीप्यमान’ कारकीर्द घेऊन राजकीय नेत्यांच्या दरबारी सध्या जा ये करत आहेत.मात्र ज्यांचा प्रवास “खर्च’ जास्त तोच प्रवास पूर्ण करेल अशी ही चर्चा सध्या रंगत आहे.काही अधिकारी बाहेरून आले असून त्यांचा प्रवास त्या खुर्ची पर्यंत जाईल का नाही माहित नाही मात्र प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.त्यातील तीन जण “वेट ऍण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. का दिनेश आहेर तीन वर्षे या पदावर कार्यरत राहतात याकडेच सध्या सर्वांचे लक्ष लागून आहे.