अहिल्यानगर दिनांक 8 ऑगस्ट
येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा वादळ मुंबईत येऊन धडकणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी हाक दिली असून. मुंबईत आरक्षणाचा हुंकार घुमणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईसह राज्यात लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी मुंबईच्या वेशीवर वाशी येथे मराठा वादळ धडकले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मागण्या मान्य केल्या होत्या. त्यातील काहींचे अद्याप अंमलबजावणी न झाल्याने तसेच ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना सरसकट आरक्षण न दिल्याने आता मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी आता आरपारची लढाईची घोषणा केली आहे. गेल्या महिन्यात अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक झाली. त्यात त्यांनी मुंबईमध्ये आंदोलनाची घोषणा केली. मराठा समाजाला कोणीही रोख शकत नाही. आता विजयाचा गुलाल घेऊनच यायचे असे आवाहन त्यांनी समाजाला केले. 27 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवाली सराटी येथून मराठा समाजाचा मोर्चा निघेल. तो 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकेल.
यासाठी आता राज्यभर विविध शहरात आणि गावागावात बैठकीचे नियोजन सुरू असून अहिल्या नगर शहरातही रविवारी मनोज जरांगे पाटील मोर्चाचे नियोजन करण्यासाठी येणार आहेत.
रविवार दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजता नगरच्या शासकीय विश्रामगृह येथे बैठक आणि गाठीभेटी आयोजित करण्यात आल्या असून त्यासाठी मनोज जारंगे पाटील हे ९ तारखेला रात्री उशिरा नगर मध्ये दाखल होणार आहेत. रविवारी दिवसभर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांशी पुढील नियोजनाबाबत बैठका आणि गाठीभेटी होणार आहेत. यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांनी नगरच्या शासकीय विश्रामगृहावर उपस्थित राहावे असे आवाहन अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.