अहमदनगर दि. १९ मे
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे बुधवारी अहमदनगर मध्ये ईद मिलन च्या कार्यक्रमास आले असताना यावेळी भाषणामध्ये त्यांनी नगरमधील कापड बाजारामधील फेरीवाल्यांच्या प्रश्नाबाबत उल्लेख करून या फेरीवाल्यांच्या मागे मी उभा आहे त्यांना कुणी हात लावल्यास स्वतः मी नगर मध्ये येऊन त्यांच्या मागे उभा राहील असे सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता चांगलेच वादंग उठले असून फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष साहेबान जाहागीरदार यांनी इमतियाज जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनीही खासदार इम्तियाज जलील ज्यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवून चांगलेच सुनावले आहे.
काय लिहीलंय पत्रात वाचा
नगर शहरातील फेरिवाल्यांच्या अतिक्रमणाच्या प्रश्ना बाबत आपणांस खूप पुळका असल्याचे समजले. एखाद्या लोकप्रतिनिधीने आपलं ठेवावं झाकून अन् दुसऱ्याचं बघावं वाकून अश्या प्रकारे वागणूक करणं चुकीचं आहे. आपल्या संभाजीनगर मतदार संघातील अतिक्रमणा बाबत आपण वेगळी भूमिका घेता आणि आमच्या अंबिकानगर शहरात येऊन वेगळी पोळी भाजता हे कशासाठी ? तुम्हाला लोकांनी तुमच्या मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी तेथील कामं करण्यासाठी निवडून दिले आहे तर आपण इतर ठिकाणी जाऊन उगाच वेगळी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. आणि नगरच्या प्रश्नांचा एवढाच कळवळा आहे तर नगर ला पाण्याची चेंबर ची नळांची रस्त्यांची लाईट ची अशी अनेक समस्या आहेत यावर सुद्धा आपण भाष्य करावं. व्यापारी हा कर भरून शासनाला देशाच्या राज्याच्या पर्यायाने आपल्या शहराच्या विकासासाठी हातभार लावत असतो आणि अश्याच व्यापाऱ्यांना जर मुजोर फेरीवाल्यांमुळे कोंडीचा सामना करावा लागत असेल तर संघर्ष अटळ आहे मग कोणी माई चा लाल का मध्ये येईना . आपण सर्व गोष्टी ची सत्यता तपासून या अतिक्रमण बाबतीत बोलायला हवं एक बाजू पाहून बोलत असाल तर आपण धर्मांध पणाचे पुरस्कर्ते होत आहात आणि याला उत्तर देखील तसेच मिळेल. कृपया आपण आपल्या मतदारसंघातील लोकांना सोय सुविधा देण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी प्रयत्न करावा उगाच दुसरीकडे आपला वेळ वाया घालवू नका.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी खरमरीत पत्र लिहून खासदार इम्तियाज जलील यांना चांगला टोला लगावला आहे. आता यावर अहमदनगर शहरातील एम आय एम चे पदाधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कापड बाजारातील फेरीवाल्यांचा प्रश्न सुटत असल्याचे समजत आहे मात्र पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांनी ते प्रकरण चांगलेच गरम झाल्याचं दिसून येतेय.