Home राज्य मुंबई – गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी कोकणातील...

मुंबई – गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी कोकणातील पत्रकार देणार तहसीलदारांना निवेदन

रायगड दि.२२ एप्रिल

मुंबई – गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पत्रकार संघाच्यावतीने १७ मे रोजी तहसिलदारांना निवेदने देण्यात येणार असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आज येथे केली..
रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा आज माणगाव येथे संपन्न झाला.. यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे, माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर, परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे,परिषदेचे विभागीय सचिव विजय मोकल, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, सुनील वाळुंज आदि उपस्थित होते..
आपल्या भाषणात एस.एम देशमुख म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणासाठी कोकणातील पत्रकार आंदोलन करीत होते तेव्हा सारेच शांत होते.. मात्र आता रस्त्याचं काम पूर्ण होत आले असल्याने प्रत्येक जण महामार्गाला वेगवेगळी नावं समोर करून पत्रकारांच्या मागणीस खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.. हा महामार्ग केवळ कोकणातील पत्रकारांनी सलग सहा वर्षे लढा दिल्याने होत आहे हे वास्तव सर्वांना माहिती आहे.. आणि बाळशास्त्री हे कोकणचे सुपूत्र असल्याने या महामार्गाला त्यांचे नाव देणे औचित्यपूर्ण ठरणार आहे.. राज्यातील एखादा महामार्ग पत्रकाराच्या नावाने ओळखला जाणार असेल तर त्याला कोणी मोडता घालू नये असे आवाहन देशमुख यांनी केले.. १७ मे रोजी बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी असून त्या निमित्ताने कोकणातील प्रत्येक तालुक्यातील पत्रकार तहसिलदारांना, जिल्हाधिकारी यांना निवेदनं देऊन महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्याची मागणी करतील..
एस.एम देशमुख यांनी आपल्या भाषणात पत्रकार पेन्शन, पत्रकारांवरील वाढते हल्ले, आणि अधिस्वीकृती समिती तसेच पत्रकारांच्या अन्य प्रश्नांचा धांडोळा घेतला.. पेन्शनचे जाचक नियम शिथिल करावेत, पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, अधिस्वीकृती समितीची पुनर्रचना करावी अशा मागण्या त्यांनी केल्या त्यावर अदिती तटकरे यांनी पत्रकार संघटनांची पुढील महिन्यात बैठक बोलावून पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नावर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले..अलिबाग येथे सुसज्ज माहिती भवन उभे राहणार असून एक – दीड वर्षात त्याचे काम पूर्ण होणार आहे.. अशा प्रकारचे राज्यातील हे पहिलेच माहिती भवन असेल अशी माहिती अदिती तटकरे यांनी यावेळी दिली..
– शहरी भागापेक्षा ग्रामिण भागातील पत्रकारिता ही खरी सजग पत्रकारिता आहे. मात्र आजच्या काळात केवळ पत्रकारिता करून आपले कुटुंब चालविणे अशक्य असल्याने पत्रकारांनी या क्षेत्राशी निगडीत असलेले अन्य कौशल्य जाणून घेणे गरजेचे असल्याचा मौलिक सल्ला ज्येष्ठ माध्यमकर्मीं समीरण वाळवेकर यांनी दिला.
यावेळी शरद पाबळे, विजय मोकल, भारत रांजणकर यांची भाषणे झाली.. मेघराज जाधव आणि प्रफुल्ल पवार यांनी पुरस्कारार्थींच्यावतीने मनोगत व्यक्त केले.. आचार्य अत्रे युवा संपादक पुरस्कार बीडच्या झुंजार नेता दैनिकाचे संपादक अजित वरपे यांना देण्यात आला..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version