Home शहर नाशिक पोलिसांनी केली ४२ नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारिची कारवाई महाराष्ट्रात अशी कारवाई...

नाशिक पोलिसांनी केली ४२ नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारिची कारवाई महाराष्ट्रात अशी कारवाई प्रथमच…एस पी साहेब नगरमध्ये सुद्धा जीवघेण्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारची कारवाई करणार का ?

अहमदनगर दि.९ जानेवारी
संक्रांतीला पतंग उडवण्यासाठी महाराष्ट्रमध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी नाशिक पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेंतर्गत असा मांजा विक्री करणाऱ्या ४२ विक्रेत्यांना शहर पोलिसांनी १५ दिवसांसाठी शहरातून हद्दपार केले आहे. शहरातील रविवार कारंजा आणि मध्यवर्ती भागात पतंग, मांजाची बाजारपेठ आहे. त्यामुळे या भागातील सर्वाधिक २३ विक्रेत्यांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे.

महाराष्ट्रात संक्रांतीनिमित्त १५ जानेवारी रोजी पतंगोत्सव साजरा होणार आहे. पतंगोत्सवाचा उत्साह आतापासूनच सर्वत्र दिसत आहे. मागील काही वर्षात पतंगोत्सवात पारंपरिक मांजाऐवजी नायलॉन हा प्रतिबंधित मांजाचा वापर वाढला आहे. या प्रतिबंधित मांजाची विक्री काही जणांकडून छुप्या पध्दतीने केली जात असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे.

या नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवितास धोका निर्माण होऊन नागरिकांसह पक्षी, प्राणी यांचे जखमी होण्याचे अथवा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा मांजामुळे शाळकरी मुले व दुचाकीस्वारांचा अपघात होऊन जखमी अथवा मृत्यू झाले आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तारांमध्ये अडकून काही ठिकाणी आगीही लागतात. नायलॉन मांजाचे विघटन होत नसल्याने कित्येक दिवस तो झाडे आणि तारांमध्ये तसाच अडकून असतो. पक्ष्यांसाठी तो जिवघेणा ठरतो.

ज्याप्रमाणे नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करत तडीपार करण्याची ठोस कारवाई केली आहे यामुळे निश्चितच नायलॉन मांजा विक्रीला आळा बसणार आहे. त्यामुळे नगर पोलिसांनीही याच प्रकारे नायलॉन मांजा विक्रेत्यांना काही दिवसांसाठी तडीपारची कारवाई करण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. या नायलॉन मांजामुळे नगर शहरातही आजपर्यंत अनेक नागरिक जखमी झाले आहेत तर काहींचा मृत्यूही झाला आहे.त्यामुळे पोलिसांनी आता कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्वसामान्य जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आणि पशु पक्षांचे प्राण वाचवण्यासाठी अशा नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करत त्यांना तडीपार करावे तरच या नायलॉन मांज्याचा विक्रीला आळा बसू शकतो.

महानगर पालिका पथक दंड करूनही एकाच दंडाची पावती दुसऱ्यांदा छापा टाकल्यावर दाखवली जाते त्यामुळे महानगरपालिकेने दंड करूनही काहीच उपयोग होत नसल्याने पोलिसांनी आता ही तडीपारीची कारवाई करणे गरजेचे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version