Home शहर आता काँग्रेसही उतरणार चितळेरोडच्या राजकीय आखाड्यात, सुरु करणार जनसंपर्क कार्यालय

आता काँग्रेसही उतरणार चितळेरोडच्या राजकीय आखाड्यात, सुरु करणार जनसंपर्क कार्यालय

अहमदनगर दि.१४ ऑगस्ट

पंचवीस वर्षे शहराचे आमदार आलेले दिवंगत शिवसेना (shivsena ) उपनेते अनिल राठोड यांच्यामुळे चितळे रोडला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांनी देखील चितळे रोडला आपले कार्यालय थाटले. आगामी काळात महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. आता काँग्रेसही चितळे रोडच्या राजकीय आखाड्यात उतरत असून अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कार्यालय व जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लवकरच चितळेरोडला स्थलांतर होत असल्याची माहिती शहर जिल्हा सचिव गणेश आपरे यांनी दिली आहे.

आजी-माजी आमदारांच्या कार्यालयाच्या अगदी मधोमध असणाऱ्या मिरावली बाबा दर्गाजवळ हे कार्यालय आहे. दोन आठवड्यांपूर्वी “लवकरच” असा फलक पक्षाच्या वतीने या चौकात लावण्यात आला होता. याबद्दल मोठी उत्सुकता नागरिकांमध्ये आणि बाजारपेठेत होती की काँग्रेसला यातून नेमके काय म्हणायचे आहे. मात्र काँग्रेसच्या आजच्या या घोषणेनंतर काँग्रेस कार्यालय नागरिकांसाठी बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी सुरू होत असल्याचे समोर आले आहे.

माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. उद्घाटनाच्या औपचारिक कार्यक्रमाचा मुहूर्त हा ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्या मधला असणार आहे. मात्र घटस्थापनेच्या दिवशी दि. २६ सप्टेंबर पासून हे कार्यालय जनसेवेसाठी खुले करण्यात येणार आहे. पूर्वी लालटाकी येथील कालिका प्राइड बिल्डींग मधून शहर काँग्रेसचे अधिकृत कार्यालय चालायचे. काळे यांचे संपर्क कार्यालय सावेडी येथून चालायचे. ही दोन्ही कार्यालयं बंद करुन आता लोकआग्रहास्तव चितळे रोडला दोन्ही कार्यालयं स्थलांतरित करीत असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

आपरे म्हणाले की, माजी मंत्री आ.थोरात यांनी शहर काँग्रेसचे नेतृत्व काळे यांच्या हाती सोपवल्यापासून मागील दोन वर्षांच्या अल्पकाळामध्ये शहरात काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे काम त्यांनी केले आहे. शहरातील प्रत्येक सर्वसामान्य घटकाला, गोरगरीबाला, व्यापारी वर्गाला ते जवळचे वाटतात. हक्काचे वाटतात. म्हणूनच सातत्याने शहरातील नागरिकांचा आग्रह त्यांच्याकडे सुरू होता की आपण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय सुरू करावे. कार्यालय नागरिकांसाठी दिवसभर खुले असणार आहे. काळे हे स्वतः दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत नागरिकांच्या भेटीसाठी या कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. नागरिकांनी त्यांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी या कार्यालयाच्या माध्यमातुन संपर्क साधावा, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version