अहमदनगर दि.३० सप्टेंबर
हनी ट्रॅप करून मोबाईलवर संभाषण अथवा व्हिडिओ चित्रण करून उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळण्याचा प्रकार मध्यंतरीच्या काळात उघड झाला होता. याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर हनीट्रॅपचा पोलिसांनी पडदा फाश केला होता. त्याचप्रमाणे आता अहमदनगर शहरातील एक गॅंग सध्या सक्रिय झाली असून या गॅंग मध्ये आठ ते दहा सदस्य असल्याची माहिती आहे. शहरातील विविध भागातून जमा झालेली सर्व धर्मीय असलेल्या या गॅंग मध्ये तथाकथित स्वयंघोषित राजकारणी(कोणत्याही पक्षाशी संबधीत नसताना) स्वयंघोषित तथाकथित पत्रकार(कुठेही पत्रकारिता न करता फक्त सांगायला) सुटा बुटातले कार्यकर्ते सक्रिय आहेत.
एखाद्या कार्यालयाची रेकी करून त्या ठिकाणी सावज शोधायचे आणि मग त्या सवाजा बद्दलची सर्व माहिती काढून त्याच्या कडे कामा निमित्ताने “ती” ला पाठवायचे त्यानंतर कामानिमित्ताने फोन नंबरची देवाणघेवाण झाली की मग तिथून पुढे होतो हनी ट्रॅपचा खरा खेळ… आधी फोन मग व्हाट्सअप मेसेज आणि नंतर थेट मोबाईल मधून रूम पर्यंतचा प्रवास तर कधी कधी चारचाकी गाडीतच नको ते उद्योग करण्यासाठी भाग पाडून सावजाला ब्लॅकमेलिंगला सुरुवात करायची सावज जाळ्यात अडकल्याच लक्षात येताच मग इतर कार्यकर्ते हळूहळू पुढे येतात. आधी मिटवा मिटवीचा प्रयत्न होतो. जर मिटवा मिटवी व्यवस्थित झाली नाही तर मग पोलिसांचा धाक दाखवला जातो. तथाकाधित पत्रकार राजकारणी आपण प्रकरण मिटवू म्हणून प्रयत्न करतात तिथे डाळ शिजली नाही तर मग सुटा बुटातले ते कार्यकर्ते तिला घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन व्हिडिओ कॉल करून लोकेशन दाखवून पैसे मागितले जातात. अखेर शेवटी कुठेतरी तडजोड करून प्रकरण मिटवले जाते. पोलीस स्टेशनमध्ये जायची वेळ आली तर गेले तरी तथाकथित पत्रकार तथाकथित राजकारणी हे आपला रुबाब दाखवतात आम्ही उच्च अधिकाऱ्यांना सांगू उपोषण करू आंदोलन करू तुमची तक्रार करू असा दमही दिला जातो बाहेर झालेल्या प्रकरा बद्दल पोलीसही अनभिज्ञ असतात आणि महिलेवरील अत्याचार असल्यामुळे पोलीसही कधीकधी गुन्हा दाखल करून घेतात.मात्र खरी वस्तुस्थिती वेगळीच असते.
या गँगने आतापर्यंत रेल्वे विभाग तसेच विविध शासकीय कार्यालयातील सात ते आठ लोकांना आपल्या ट्रॅपमध्ये गुंतवून लाखो रुपयांची माया कमवली असल्याची माहिती समजली आहे. समाजात आपण कसे चांगले आहोत हे दाखवण्यासाठी विविध नेत्यांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करून ही गॅंग समाजात वेगळा चेहरा दाखवतात आणि पडद्या मागे वेगळाच चेहरा असतो.
समाजातील इज्जत तसेच घर गृहस्ती आणि घरात असलेल्या महिला,मुलंबाळ यांच्याकडे पाहून फसले गेलेले सावज म्हणजे तो माणूस पोलिसांकडे जायला घाबरतो आणि याचाच फायदा गॅंग घेत आहे.
वरील बातमीबद्दल ज्या लोकांबरोबर घटना घडल्या आहेत त्यांच्याबरोबर सहमतीने चर्चा करूनच बातमी करण्यात आली आहे.