Home शहर अस्तित्वात नसलेल्या प्लॉटची खरेदी विक्री आणि त्यावर पतसंस्थेचे चाळीस लाखांचे कर्जही काढले...

अस्तित्वात नसलेल्या प्लॉटची खरेदी विक्री आणि त्यावर पतसंस्थेचे चाळीस लाखांचे कर्जही काढले या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची शेख शाहरुख हसन यांची मागणी

अहमदनगर दि.४ नोव्हेंबर ः 

अहमदनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अस्तित्वात नसलेल्या प्लॉटची खरेदी विक्री करून त्यावर एका पतसंस्थेचे 40 लाख रुपयांचे कर्जही काढले आहे त्यामुळे पतसंस्थेची फसवणूक होऊ नये म्हणून शेख शाहरुख हसन यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)गणेशजी पुजारी, अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे.

या प्रकरणाची हकीगत अशी की महानगरपालिका हद्दीतील मौजे भिंगार येथील बिगरशेती प्लॉट सर्व्हे नंबर / गट नंबर 345/2अ / प्लॉट 13 क्षेत्र 226 चौ.मी., 345/2अ / प्लॉट 9 क्षेत्र 319 चौ.मी. या मिळकतीमध्ये उषादेवी गाडे, दिलीप सबाजी गाडे, सविता समीर गायकवाड, कैलास नंदु गाडे, अतुल नंदु गाडे, सोनाली नंदू गाडे, शोभा मोहन कदम, राधाबाई गोवर्धन कवडे, निता भाऊसाहेब काकडे, बापूसाहेब दिलीप गाडे, शरद दिलीप गाडे, उध्दव दिलीप गाडे यांचे नांवावर होता. या प्लॉट हा वर नमुद व्यक्तींकडून शुभम संदिप कुलकर्णी संदीप सुधाकर कुलकर्णी यांनी 31 डिसेंबर 2021 ला दस्त क्रमांक 10347/2021 अन्वये खरेदी घेतल्याचे दर्शविले आहे. हे खरेदीदस्त नोंदविणेकामीवर नमुद व्यक्तींनी 31 डिसेंबर 2021ला दुपारी  बारा वाजून 46 मिनिटांनी या वेळेवर एम.टी.आर. फॉर्म सहा घेतलेला असल्याचे त्यांचे खरेदीदस्तात नमुद आहे. या व्यवहारापोटी रक्कम रूपये 18 लाख हे 30 डिसेंबर 2021 ला 12 धनादेशाद्वारे रक्कम 14 लाख 50 हजार  आणि रोख रकम रूपये  साडेतीन लाख भरणा दिला असल्याचे नमुद केलेले आहे. त्यानुसार सदरील खरेदी प्रक्रिया पूर्ण करून दुय्यम निबंधक यांच्या समोर सदरील दस्त नोंदविलेला आहे.

त्या सदरील मिळकती विकणारे व्यक्ती यांनी स्पष्टपणे नमुद केले आहे की, सदरील प्लॉट बाबत संपुर्ण माहिती दिलेली आहे. त्या परिस्थितीत लिहून घेणार यांनी सदरील मिळकतीची खरेदी केलेली आहे. या मिळकतीचे मालकीहक्राबाबत भविष्यात उद्भवणारे वादाचे निराकरण लिहून घेणार यांनीच स्वतःच्या खर्चाने करावयाचे आहे, त्याबाबत लिहून देणार यांना कोणतीही तोषीस लागू देणार नाही.
हे व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कुलकर्णी यांनी सदरील वर नमुद मिळकतीवर कौशीक तुषार चटर्जी, तुषार निरोगाबदन चटर्जी यांना तीन जानेवारी 2022ला 20 लाखांचे मोबदल्यात खरेदी दिलेली आहे. त्याबाबतचा खरेदीदस्त दुय्यम निबंधक कार्यालयात  03 जानेवारी 2022ला  28/2022 अन्वये नोंदविण्यात आलेला आहे. परंतु सदरील व्दितीय खरेदी व्यवहार पूर्ण करण्सायाठी एम.टी.आर. फॉर्म 6 हा  24 डिसेंबर 2021 ला 12 वाजून 25 वाजता म्हणजेच प्रथम खरेदी होण्यापूर्वीच घेण्यात आलेला आहे व सदरील खरेदीखतातील रकमेच्या भरणापोटी 29 डिसेंबर 2021ला दोन धनादेश / धनाकर्ष द्वारे रक्कम 15 लाख  व पाच लाख अदा करण्यात आल्याचे नमुद केलेले आहे. त्यानुसार खरेदी प्रक्रिया पूर्ण करून गाव नमुना नंबर 7/12 वर लिपीक खरेदी घेणार चॅटर्जी यांचे नांवाची नोंद करण्यात आली आहे .

त्यानंतर लगेच वैष्णव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित  अहमदनगर यांच्याकडून 40 लाख 50 हजारचे कर्ज घेऊन त्याबाबतचा गहाणलेख दस्त क्र. 30/2022 नोंदविण्यात आलेला आहे. त्याबाबतची नोंद गाव नमुना नंबर 7/12 वर फेरफार क्र. 37070 अन्वये करण्यात आलेली आहे,

या सर्व खरेदी घटकांच्या कागदपत्रावरून असे स्पष्टपणे दिसून येते आहे की प्रथम खरेदी गाडे, कदम, गायकवाड, कवडे, काकडे यांच्याकडून कुलकर्णी यांनी घेण्यापूर्वीच  कुलकर्णी यांनी सदरील मिळकतीबाबत चटर्जी यांच्याशी व्दितीय खरेदीबाबत एम.टी.आर. फॉर्म, मोबदला रक्कम भरणा आदी प्रक्रिया केलेली होती. त्याबाबतचे द्वितीय खरेदीतील भरणा रकमेचे धनाकर्षदेखील प्रथम खरेदीपूर्वीच अदा करण्यात आलेले होते. त्यामुळे सदरील संपूर्ण खरेदीप्रक्रियाच बोगस असल्याचे निष्पण्ण होत आहे. वास्तविक पाहाता वर नमूद असलेल्या मिळकती या अस्तित्वातच नाहीत. त्या मिळकती फक्त कागदोपत्री आहेत. ही माहिती असताना देखील कुलकर्णी व चटर्जी यांनी वैष्णव नागरी पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांशी, पदाधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून फक्त कर्ज रक्कम लाटण्यासाठी सदरील खरेदी दस्ताची नोंदणी केल्याचे दिसून येत आहे.

वैष्णव नागरी पतसंस्थेने देखील सदरील मिळकतींचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून किंवा बँकेचे व्हॅल्यूअर, लिगल पॅनल वरील वकील यांचे सर्च रिपोर्ट घेणे व संबंधीतांनी समक्ष जागेवर जाऊन पाहणी करून सदरील अहवाल देणे कायदेशीररित्या आवश्यक आहे, असे असतांनाही जागेवर अस्तित्वात नसलेल्या प्लॉटचे कुलकर्णी व चटर्जी या भागीदार मित्रांनी दोन वेगवेगळ्या खरेदी दाखवून श्री वैष्णव नागरी पतसंस्थेकडून सुमारे 40 लाख रूपयांची रक्कम लाटलेली आहे,

याबाबत आता पतसंस्थेने सुद्धा आपली रक्कम वाचवण्यासाठी ज्या व्यक्तींना कर्जाद्वारे पैसे दिले आहे त्यांनी दिलेल्या कागदपत्राची छाननी करून ऑडिट करण्यात यावे तसेच अजून कोणच्या पतसंस्थांना अशा प्रकारे गंडा घातल्या असल्यास त्याची चौकशी करावी अशी मागणी शेख शाहरुख हसन यांनी निवेदनात केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version