शेवगाव दि.२५ डिसेंबर
शेवगाव पोलिसांनी सापळा रचून पाठलाग करत रेशनच्या काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा 40 टन तांदूळ पकडला आहे.या कारवाईत ९ लाख रुपये किमतीचा ४० टन तांदूळ व ट्रक असा एकूण ५३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शुक्रवारी रात्री येथील नेवासा रोडवर ही कारवाई करण्यात आली.
या आधी अनेक वेळा या प्रकरणातील भीमा ने तांदूळ विक्रीसाठी घेऊन जात असताना तो पकडल्यावर दरवेळेस नेता असलेला सरांचा फोन खनखानायचा आणि माल सुटला जायचा सरांच्या आशीर्वादाने अनेक वेळा वाचलेल्या गायकवाड वर शेवगाव पोलिसांनी सापळा रचून मोठा साठा जप्त केला आहे. मात्र या वेळेस सरांच्या फोनची मात्रा पोलिसांना लागली नाही.
शेवगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांना शुक्रवारी रात्री रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याची खबर मिळाली होती. ट्रक मधून ही वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती. त्या नुसार पोलिसांनी सापळा लावला आणि ट्रकचा पाठलाग करून शेवगाव शहरातून नेवासा रोड वर काही अंतराने पोलिसांनी हा ट्रक पकडला. यावेळी चालक बाळू सूर्यभान कोकाटे (वय २५, रा. झापेवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड) व क्लिनर प्रवीण अशोक ढोले (वय २०, रा. गदेवाडी, ता. पाथर्डी) या दोघांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केला असता, त्यांनी हा तांदूळ शेवगाव शहरातील रेणुकानगर येथून भरल्याचे पोलिसांना सांगितले चालकाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिथे जाऊन भीमा मारुती गायकवाड यांच्या घरी तपास केला. यावेळी त्याच्या घरात स्वस्त धान्य दुकानातील शासकीय तांदळाचा मोठा साठा आढळून आला. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, विश्वास पावरा, हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके,
प्रवीण बागुल, सोमनाथ घुगे, अशोक लिंपणे, संतोष काकडे, अमोल ढाळे,मापो कर्मचारी शीतल गुंजाळ
यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी या प्रकरणी आता तपास सुरू केला असून या प्रकरणाचे धागेदोरे आता कुठपर्यंत जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गरिबांच्या ताटातील अन्न काळ्या बाजारात विकून या पापा मध्ये कोण कोण सहभागी आहेत त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिक करू लागले आहेत. सरकारी एकीकडे सर्वसामान्य जनतेसाठी रेशन देत असताना भीमा गायकवाड सारखे लोक गरिबांचे अन्न हिसकावून घेऊन काळ्या बाजारात त्याची विक्री करतात ही मोठी संतापजनक गोष्ट आहे.