अहमदनगर दि.१९ जानेवारी
अहमदनगर मधील आलमगीर या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने राहात आहे मात्र काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील असे गाणे वाजवल्यामुळे ते बंद करण्यास सांगितल्याचा राग येऊन या शुल्लक गोष्टीला धार्मिक स्वरूपाचे वळण देऊन हनुमान चालीसा बंद केल्याचे खोटं सांगून दोन्ही समाजाच्या भावना दूषित करून धार्मिक दंगली घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषींवर कारवाई करा अशी मागणी आलमगीर येथील नागरीकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देऊन केली आहे.
१४ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेची सत्यता अशी की सायंकाळी सहाच्या सुमारास सोहेब आणि सोहेल मोमीन यांच्या घरा जवळील मुंडे यांच्या गच्चीवर वसंत मुंडे आणि अजय गारदे पतंग उडवत असताना त्या ठिकाणी असलेल्या साऊंड सिस्टिम वर मुस्लिम धर्माच्या भावना दुखतील असे गाणे लागल्यामुळे सोहेब आणि सोहेल मोमीन यांनी हे गाणे बंद करावे अशी विनंती केली. त्यावेळी अजय गारदे आणि सोहेब आणि सोहेल मोमीन यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. यानंतर संध्याकाळी थेट भिंगार पोलीस स्टेशनला जाऊन हनुमान चालीसा बंद करा अशी धमकी देऊन मारहाण केल्याची खोटी फिर्याद पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली. मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे येथील नागरिकांनी म्हणने आहे.
या घटनेचा योग्य तपास व्हावा आणि जे लोक या घटनेचे राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे प्रयत्न हाणून पाडावेत आणि आलमगीर परिसरात हिंदू-मुस्लीम कुटुंबीय पुन्हा गुण्यागोविंदाने राहावेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना या घटनेला जातीवादाचा रंग देऊ नये अस मत आलमगीर परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलं आहे.
तर या घटनेचे राजकीय पडसाद म्हटले असून घटना घडली त्या दिवशी रात्री शिवसेनेचे अनेक नेत्यांनी भिंगार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या घटनेबाबत निषेध नोंदवत गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण मांडले होते.मंगळवारी सायंकाळी आलमगीर परिसरात हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना आणि भाजप तर्फे घेण्यात आला.
यावेळी भिंगारच्या माजी छावणी परीषद सदस्य शिवसेना नेत्या स्मिता अष्टेकर, भाजपचे शहर अध्यक्ष भैय्या गंधे, सावेडी उपनगर प्रमुख काका शेळके, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बजरंग दल नगर शहर प्रमुख कुणाल भंडारी, नगरसेवक प्रदीप परदेशी, हिंदुराष्ट्र सेना भिंगारशहर अध्यक्ष नाना मोरे,माजी नगरसेवक संजय शेंडगे,यांच्या सह भिंगार आलमगीर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष भैया गंधे यांनी बोलताना सांगितले की पुढील काळात कुणीही हिंदू धर्मचा अवमान होईल असे कृत्य केल्यास त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल आमचा प्रयत्न दोन्ही समाजात शांतता राहावी असाच असेल मात्र हिंदू धर्माच्या विरोधात कोणी चुकीचे कृत्य केल्यास आम्ही ते सहन करणार नाही असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.
आलमगीर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा होता तर भिंगार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.