राहुरी दि.६ जानेवारी
संघटीत गुन्हे करून सर्वसामान्य जनतेला लुटणाऱ्या सागर भांड टोळीने १७ डिसेंबरला राहुरी कारागृह फोडून पलायन केले होते. विषेश म्हणजे देशाचे गृहमंत्री अहमदनगर दौऱ्यावर असताना ही घटना घडली होती. राज्याचे सर्वच वरीष्ठ पोलीस अधिकारी अहमदनगर मध्ये होते.
सागर भांड व किरण आजबे यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते तर तिसरा आरोपी जालिंदर सगळगिळे यास मनमाड रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले होते.मात्र सोन्याबापू माळी व रवी लोंढे हे अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कारागृहातुन त्यांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या एका चहावाल्याला ही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.या घटने नंतर राहुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या सह सहा पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले होते.
तर तब्बल वीस दिवसानंतर राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यावर निलंबनाचा बडगा उभारण्यात आला आहे. उपनिरीक्षक धकाराव यांची निलंबनाची कारवाई अन्यायकारक असल्याचे निवेदन काही सामाजिक संघटनांनी नुकतेच पोलीस अधीक्षकांना दिले होते त्यांचे निलंबन रद्द करावे अशी मागणी होत असतानाच पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांचे निलंबन झाल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.